BJP Sad for Power: भाजप सत्तावियोगात आजही दु:खी; चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली सल
Chandrakant Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात हातातली सत्ता जाऊन भाजपला आता दीड-दोन वर्षे होत आली. तरीसुद्धा भाजपचे सत्तावियोगाने हळहळने (BJP Sad for Power) कमी झालेले दिसत नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे ही सल बोलून दाखवली. जनतेने आम्हाला राज्यकर्ते म्हणून निवडून दिले. परंतू, आमच्यासोबत विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी आज (25 एप्रिल) पिंपरी चिंचवड येथील कोविड सेंटरला भेट दिली. या वेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील या वेळी बोलताना म्हणाले, सध्या कोरोना काळ आहे. त्यामुळे कोरोना काळात राजकारण करणं योग्य नाही. असं असलं तरी कोरोना आहे. फारसे काही करता येत नाही. म्हणून हवं ते करुन घ्या. असं होता कामा नये. शेवटी तुम्हाला लोकांनी अंकूश ठेवणारी शक्ती म्हणून निवडूण दिले आहे. आता आम्हाला जनतेने राज्यकर्ते म्हणून निवडून दिले होते. परंतू, आमच्यासोबत विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक बनलो. विरोधकाची भूमिकाही महत्तवाची असते. सत्ताधाऱ्यांवर अंकूश ठेवणारी व्यक्ती म्हणून विरोधक महत्त्वाचे असतात, असे चंद्रकांत पाटील या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Tekchand Sawarkar Viral Video: आपली निधनवार्ता ऐकून भाजप आमदार टेकचंद सावरकर भडकले; सुखरुप असल्याचा व्हिडिओ शेअर करत, पोलिसात तक्रारही दिली)

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआर विरोधात सत्ताधाऱ्यांकडून टीका होत आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले सत्ताधाऱ्यांकडून लोकांना उल्लू बनविण्याचे काम सुरु आहे. अनिल देशमुख यांची सीबाआय चौकशीही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरु आहे. सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येते आहे की, कोर्टाने केवळ चौकशीचे आदेश दिले होते. माझ्याकडे कोर्टाच्या आदेशाची प्रत आहे. त्यात शेवटच्या परिच्छेदात म्हटले आहे की, एफआयआर दाखल करण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे यात सत्तेचा दुरुपयोग येतोच कुठे? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.