भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी भागवत कराड यांना तर, शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसेभेची उमेदवारी
Rajya Sabha (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 7 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होण्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपचे 3, राष्ट्रवादीचे 2, शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार राज्यसभेत (Rajya Sabha Election 2020) जाणार आहेत. भाजपकडून (BJP) बुधवारी महाराष्ट्रातून 2 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यात माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) आणि रिपाईचे नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा समावेश होता. तर, तिसऱ्या जागेसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या नावाची चर्चा सुरु होती. यासाठी एकनाथ खडसे यांचे नाव भाजप पक्षश्रेष्ठींकडे देखील पाठवण्यात आले होते. परंतु, भाजपने एकनाथ खडसे यांच्या ऐवजी भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. यामुळे पक्षात अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच उद्या शुक्रवारी 13 मार्च रोजी राज्यसेभेचा उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारिख आहे.

राज्यसभा निवडणूक 2020 साठी भारतीय जनत पक्षाने बुधवारी आपल्या पक्षातील एकूण 9 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. महाराष्ट्रात भाजप एकूण तीन जागा असून या यादीत सातारचे उदयनराजे भोसले आणि आरपीय अध्यक्ष रामदास आठवले या 2 नावांचा समावेश आहे. यामुळे तिसऱ्या जागेसाठी एकनाथ खडसे यांच्या नावांची चर्चा रंगली होती. मात्र, भाजपने खडसे यांना डावलून भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. हे देखील वाचा- मनसे अध्यक्ष राज ठाकरे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी औरंगाबाद दौऱ्यावर

ट्वीट-

शिवसेनेकडून औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी या दोनपैकी एकाला राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता होती. यातच शिवसेनेने आपल्या उमेदवाराचे नाव घोषीत केले आहे. यावेळी प्रियंका चतुर्वेदी यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या नेत्यांनी खैरे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. मात्र, शिवसेनेने नव्या पिढिला नवा चेहरा पाहण्याची संधी निर्माण केली आहे, असे स्पष्ट होत आहे. अद्याप यावर चंद्रकांत खैरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच शिवसेनेच्या या निर्णयावर चंद्रकांत खैरे काय बोलतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या एकूण 55 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत निवडणूक आयोगाने 25 फेब्रुवारीलाच घोषणा केली होती. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एकूण 17 राज्यातील 55 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ एप्रील 2020 मध्ये संपत आहे. कार्यकाळ समाप्त होत असलेल्या सदस्यांची सर्वाधिक सख्या ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात 7, तामिळनाडू 6, पश्चिम बंगाल आणि बिहार प्रत्येकी 5, गुजरात आणि आंध्र प्रदेश, राजस्थान प्रत्येकी 3 यांसह इतरही राज्यांचा समावेश आहे.