Maratha Kranti Morcha: उद्धव ठाकरे, संजय राऊत, श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्याविरुद्ध अटक वॉरंट?
Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray | (Photo Credit: Twitter and Facebook)

Maratha Kranti Morcha: शिवसेना (Shiv Sena)मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'दै. सामना' (Saamana) मध्ये प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त व्यंगचित्र प्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena Party Chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) तसेच, व्‍यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्‍याविरुद्ध वॉरंट जारी करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. आरोपी हे अनेकदा समन्स बजाऊनही न्यायालयात उपस्थित राहात नसल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करावे असे या प्रकरणात खटला सुरु असलेल्या पुसद न्यायालयाकडे फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयाकडे मागणी केली आहे.  मराठा क्रांती मोर्चा निघत असलेल्या काळात दोन वर्षांपूर्वी दै. सामनामध्ये एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.

मराठा क्रांती मोर्चा काळात सामनामध्ये व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांचे दै. सामनामध्ये हसोबा पसन्न या सदराखाली एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते. या व्यंगचित्रातून मराठा क्रांती मोर्चाची खिल्ली उडवण्यात आल्याचा आणि मराठा समाजाच्या महिला आणि बांधवांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. मराठा क्रांती मोर्चा हा मूक पद्धतीने काढण्यात आला होता. हसोबा प्रसन्न या सदरात 'मुका मोर्चा' असा शब्दच्छल करत व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते.

हे व्यंगचित्र सामनामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रात जोरदार पडसाद उमटले होते. मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा आंदोलकही आक्रमक झाले होते. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाचे मुख्य संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कार्यकारी संपादक म्हणून मराठा समाजाची भावना दुखावली गेल्याबद्दल माफीही मागितली होती. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या प्रमाणे दूरदृष्टी दाखवावी: उद्धव ठाकरे)

ट्विट

दरम्यान, या व्यंगचित्रावर आक्षेप घेत दत्ता सुर्यवंशी नामक व्यक्तीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत तसेच, व्‍यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्या विरोधात पुसद न्यायालयात तक्रार दाखल केली होती.