Nashik: चिंताजनक! नाशिक शहरात एकाच दिवशी 9 जणांचा चक्कर आल्याने मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ज्यामुळे रुग्णांना बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन आशा आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून येत आहे. अशातच नाशिककरांसह संपूर्ण महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. नाशिक (Nashik) शहरात चक्कर आल्याने एकाच दिवशी 9 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. नाशिकमधील या नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच चक्कर येणे किंवा मळमळ होणे याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

महत्वाचे म्हणजे, गेल्या तीन दिवसांत चक्कर आल्याने एकूण 13 जण दगावले आहेत. दोन दिवसांपूर्वी देखील चक्कर आल्याने एकाच दिवशी 4 जणांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूंमागे वाढत्या तापमान हे कारण आहे की आणखी कोणत्या घटकामुळे अशी परिस्थिती निर्माण होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता आणखी खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कोरोना संकटाशी लढत असताना नागरिकांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे. हे देखील वाचा-Mumbai: मास्क घालण्यास नकार देवून पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीस मुलुंडमध्ये अटक

नाशिक येथेही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये गेल्या 24 तासात 5 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. तर, 35 जणांचा मृत्यू झाला होता. ज्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मृत्यूंची संख्या 2 हजार 816 वर पोहचली आहे. नाशिकमध्ये अवघ्या 4 दिवसात 200 बळी गेले आहेत. याचबरोबर 4 हजार 205 जणांनी कोरोनावर मात केली आहे.