Aarey Forest Case: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा
मुंबईच्या बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानजवळील (Sanjay Gandhi National Park) आरे दुग्ध वसाहती (Aarey) मधील 600 एकर जागा राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईच्या बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानजवळील (Sanjay Gandhi National Park) आरे दुग्ध वसाहती (Aarey) मधील 600 एकर जागा राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशाप्रकारे विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार असल्याचे उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. 'कुलाबा-वांद्रे-सिप्झ' या 'मेट्रो-3' च्या कारशेडच्या उभारणीमुळे 'आरे'ची जागा गेल्या अनेक दिवसांपासून वादात आली होती. दरम्यान, पर्यावरणप्रेमींनी याला मोठा विरोधही दर्शवला होता.
4 ऑक्टोबर 2019 मध्ये मुंबई मेट्रो 3 च्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधील हजारो झाडांची रातोरात कत्तल करण्यात आली होती. यानंतर या परिसरात पर्यावरणप्रेमींनी मोठी गर्दी करत वृक्षतोडीला विरोध दर्शवला होता. यासाठी त्यांनी अनेक अंदोलनदेखील केली होती. महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने पर्यावरणासाठी धोकादायक असलेले मेट्रो कामाला स्थगिती दिली होती. त्यानंतर आरेबाबत राज्य सरकार काय निर्णय देणार? याकडे सर्व पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले होते. यातच राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे. हे देखील वाचा- 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घरातून कारभार', विरोधकांच्या आरोपावर परिवहन मंत्री अनिल परब यांचा प्रहार
ट्वीट-
600 acres of Aarey land near Sanjay Gandhi National Park will be reserved as forests. This will be the first instance of an extensive forest blossoming within the limits of a metropolis anywhere in the world. pic.twitter.com/T1zkgB6WkL
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 2, 2020
या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात प्रस्तावना केली. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी या प्रस्तावासंदर्भात पुढाकार घेतला होता. या बैठकीस वन मंत्री संजय राठोड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव वने मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव पदुम अनुपकुमार आदींनी उपस्थिती दर्शवली होती.
(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2020 09:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

