Coronavirus Update: महाराष्ट्रात आणखी 328 नवे रुग्ण आढळले; राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 648 वर
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणू आता भारतातही आपले जाळे पसरवू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असतानाही रुग्णांच्या संख्येत सकारात्मक बदल झाला नाही. यातच महाराष्ट्रात (Maharashtra) आज आणखी 328 नवे रुग्ण आढळल्याचे समजत आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 648 वर पोहचली आहे. यात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात  आढळून आले आहेत. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात 1 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 20 लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधीत झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसेच 170 हून अधिक देश कोरोना विषाणूशी झुंज देत आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी 24 मार्च रोजी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी घोषीत केली. मात्र कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता 14 एप्रिलनंतरही 3 मेपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 14 हजार 792 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 448 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 हजार 015 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 3 हजार 648 वर पोहचली आहे. यात मुंबईत 184 तर, पुणे शहरात 78 नवे रुग्ण आढळून आले आहेत. हे देखील वाचा- महाराष्ट्रात 20 एप्रिल पासून शिथील करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये 'प्रिंट मिडीया' चाही समावेश; वर्तमानपत्र, मासिक घरोघरी वितरणावर निर्बंध

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.