Shramik Special Train: महाराष्ट्रातून परराज्यातील नागरिकांना घेऊन 145 ट्रेन सोडणार; रेल्वे मंत्रालयाची माहिती
Shramik special train | (Photo Credits: PTI)

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल (Railway Minister Piyush Goyal)  यांच्यात श्रमिक स्पेशल ट्रेन्सच्या (Shramik Special Train) मागणीवरून सुरु असणाऱ्या वादातून अखेरीस एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रातून 145 गाड्या चालवल्या जातील असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने पश्चिम बंगालसाठी 41 श्रमिक स्पेशल गाड्यांची मागणी केली होती या रेल्वे आज महाराष्ट्रातून सुटतील असा विचार आहे. असं असलं तरी पश्चिम बंगाल (West Bengal)  मध्ये अ‍म्फान चक्रीवादळानंतर (Cyclone Amphan) पश्चिम बंगाल सरकारने या गाड्या सोडल्या जाऊ नयेत असे मत मांडले होते. मात्र हा प्रश्न पश्चिम बंगाल सरकार आणि महाराष्ट्र सरकारने सोडवावा अशी विनंती रेल्वे मंत्रालयाने ठाकरे सरकारकडे केली आहे.

महाराष्ट्र सरकारकडून परराज्यातील नागरिकांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यासाठी ट्रेनची मागणी केली जात आहे मात्र केंद्र सरकारकडून या ट्रेन उपलब्ध करून देण्यात दिरंगाई होत आहे असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. याची दखल घेत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ठाकरे यांनी एका तासात प्रवाशांची यादी पाठवावी आपण 125 ट्रेन सोडण्यास तयार आहोत असे सांगितले होते, त्यांनतर दुसऱ्या दिवशी ठाकरे सरकारकडे ही यादीच तयार नाही त्यामुळे काही वेळा ट्रेन सोडूनही त्यानं रिकाम्या परत पाठवाव्या लागल्या असे गोयल यांनी म्हंटले होते. या एकूण प्रकरणातून ठाकरे सरकार विरुद्ध गोयल असा वाद सुरु होता.

ANI ट्विट

दरम्यान, प्राप्त माहितीनुसार 1 मे पासून देशभरात 3026 श्रमिक ट्रेन धावल्या असून यामधून आतापर्यंत 40 लाख स्थलांतरित मजुरांनी प्रवास केला आहे. दरम्यान स्थलांतरित मजुरांसाठी देशभरात सर्वाधिक ट्रेन गुजरातमधून धावल्या आहेत. गुजरातमधून 853 ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक असून महाराष्ट्रातुन 7.38 लाख मजूर 527 ट्रेनने त्यांच्या राज्यात परतले आहेत.