Delhi: पतीची हत्या करून एका महिलेने चक्क फेसबुकवर ठेवला स्टेटस; दिल्लीच्या छतरपूर एक्स्टेन्शन परिसरातील घटना
Representational Image | (Photo Credits: PTI)

पतीची हत्या (Murder) करून एका महिलेने चक्क फेसबूकवर (Facebook) स्टेटस ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना दिल्ली (Delhi) येथील छतरपूर एक्स्टेन्शन (Chhatarpur Extension) परिसरात घडली आहे. एवढेच नव्हेतर, पतीची हत्या केल्यानंतर संबंधित महिलेने स्वत: ही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने, ती वाचली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते, मग दोघांमध्ये नेमके काय झाले? तसेच कशावरून वाद टोकाला पोहोचला? याबाबत अद्याप काहीच समजू शकले नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

चिराग शर्मा, असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चिराग यांचा गेल्या आठ वर्षापूर्वी रेणुका हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चिराग आणि रेणुका यांच्यात खटके उडत होते. दरम्यान, किरकोळ कारणांवरून त्यांच्यात रोज वाद होत असे. याच वादातून रेणुकाने चिरागची चाकूने सपासप वार करत हत्या केली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रेणुकाने हत्येनंतर फेसबुकवर स्टेटस ठेवून हत्येची कबुली दिली आहे. त्यानंतर तिनेही आत्महत्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेची माहिती होताच घरमालक आणि शेजारच्यांनी पोलिसांत कळवले. त्यानंतर पोलीसांनी ताबडतोब घटनास्थळ गाठून कारवाईला सुरुवात केली. हे देखील वाचा- लज्जास्पद! केवळ 70,000 रुपयांसाठी जन्मदात्या पित्यानेच विकले आपल्या 1 महिन्याच्या बाळाला, हैदराबाद मधील धक्कादायक घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी पोलीस घटनास्थळी पोहचले, तेव्हा चिराग आणि रेणुका दोघेही बेशुद्ध अवस्थेत होते. यामुळे पोलिसांनी तातडीने दोघांनाही जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, त्यावेळी चिरागचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. तर, सुदैवाने रेणुकाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.