China Snooping On PM Narendra Modi, CM Uddhav Thackera: राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चीन ठेवतय पाळत, करतंय हेरगिरी- रिपोर्ट
President Ramnath Kovind, Prime Minister Modi, Chief Minister Uddhav Thackeray, Rahul Gandhi | (Photo credit: Archived, Edited, Symbolic Images

भारताचा शेजारी चीन सीमा प्रश्नावरुन सातत्याने भारताची कुरापत काढत आहे. भारतीय सैन्य चीनच्या कुरापतीचा सामना करत आहे. दरम्यान, आता आणखी एक नवाच आणि धक्कादायक प्रकार पुढे आला आहे आहे. चीन हा भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi), केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह देशभरातील इतरही अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंवर हेरगीरी करत असल्याचे पुढे आले आहे. इंडियन एक्सप्रेसचा हवाला देत आमचे सहकारी पोर्टल latestlyने याबाबत वृत्त दिले आहे.

वृत्ता पुढे म्हटले आहे की, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबीय, पंजाबचे मुख्यमंत्री-अमरिंदर सिंग, ओदिशा- नवीन पटनायक, पश्चिम बंगाल- ममता बॅनर्जी, राजस्थान- अशोक गेहलोत, मध्य प्रदेश -शिवराज सिंह चौहान यांच्यासह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, रविशंकर प्रसाद, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, पीयूष गोयल, चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, हिंदू समूहाचे अध्यक्ष एन. रवी, झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी, इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई, पंतप्रधान कार्यालयातील माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांच्यावह चीन बारकाईने लक्ष ठेऊन आहे. एक प्रकारे हेरगिरी करत आहे. (हेही वाचा, चीन वेडा बनून खातयं पेढा? जग देतंय कोरोना व्हायरस विरोधात लढा; हिंद महासागरात तैनात चायनीज अंडरवॉटर ड्रोन)

कोरोना (Coronavirus) नावाच्या विषाणूची एक वात चीनमधील वुहान या शहरातून पेटली आणि तिचा वनवा जगभर पसरला. जगभरातील देश या वनव्यातून जात आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. कोरोना व्हायरस या संकटाशी तोंड देत असलेला भारत, बेरोजगारी, घसरलेली अर्थव्यवस्था वाढती महागाई आणि आरोग्याच्या समस्येशी तोंड देत असतानाच शेजारी राष्ट्र चीन सातत्याने वाद उकरुन काढत आहे. मग मुद्दा लद्दाख, गलवान खोरे असो किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमांतून भारतीयांवर ठेवलेली नजर असो. आताही असाच धक्कादायक प्रकार प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तातून पुढे येत आहे.