Lockdown: Air India आणि रेल्वेची तिकीटविक्री 14 एप्रिल नंतर सुरु होणार? लॉक डाउनच्या घोषणेवर शिक्कामोर्तब न झाल्याने भारतीय रेल्वे आणि विमान कंपन्यांमध्ये संभ्रम
Railways & Airlines (Representational Image Only) (Photo Credits: Youtube & Pixabay)

नवी दिल्ली: देशव्यापी लॉक डाऊन (Lock Down) च्या कालावधीत वाढ झाल्याची चर्चा असली तरी अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीच अधिकृत घोषणा झालेली नाही परिणामी, भारतीय रेल्वे (Indian Railways) आणि विमान कंपन्यांमध्ये (Indian Airlines) तिकीटविक्रीच्या बाबत संभ्रम दिसून येत आहे. टाइम्सच्या माहितीनुसार भारतीय रेल्वे 14  एप्रिल नंतरही काही काळासाठी तिकीट बुकिंग बंदच ठेवण्याचा विचार करत आहे. तसेच ज्यांनी याआधी तिकीट बुक केले आहे ते बुकिंग तूर्तास सस्पेंडेड राहील. जोपर्यंत सरकारतर्फे रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्याच्या बाबत घोषणा होत नाही तोपर्यंत तरी रेल्वेचे तिकीट बुकिंग बंद असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घोषित केलेल्या 21 दिवसीय लॉक डाऊनचा उद्या शेवटचा दिवस आहे, त्यानंतर रेल्वेसेवा पुन्हा सुरु करण्यात येईल असा अंदाज होता मात्र आताची परिस्थिती पाहता सर्व सेवा पुर्वव्रत करण्यासाठी अधिक अवधी लागेल अशी चिन्हे आहेत. Coronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 9152; मागील 24 तासांमध्ये 35 जण Covid 19 चे बळी

Business Standard च्या रिपोर्ट नुसार,1 ते 11 एप्रिल दरम्यान 670,295 तिकीट बुकिंग करण्यात आले आहे. अद्याप रेल्वेसेवा पुन्हा सुरु होण्याच्या बाबत काहीच घोषणा नसतानाही मागील 7 दिवसात 45% तिकीट बुकिंग झाले आहे. यापूर्वी भारतीय रेल्वेने 14 एप्रिल नंतर तिकीट बुकिंग सुरु करणार असे म्हंटले होते तर एअर इंडिया ने मात्र 30 एप्रिल पर्यंत तिकीट बुकिंग रद्द केले आहे. उद्या कोरोनामुळे लागू करण्यात आलेले लॉक डाऊन संपणार आहे मात्र देशातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता लॉक डाऊनचा अवधी वाढवण्यात येईल असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.

दरम्यान, या एकूण संभ्रमाच्या बाबत बोलताना एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी "केंद्र सरकारने लवकरात लवकर आवश्यक त्या घोषणा कराव्यात जेणेकरून कामाच्या बाबत संस्थांना स्पष्टता येईल" अशी मागणी केली आहे. जर का आपण तिकीट बुकिंग केले नाही तर आर्थिक नुकसान होईल आणि जर का तिकीट बुकिंग करून नंतर सेवा रद्द केल्या तर प्रवासी संतापतील अशा परिस्थितीत सरकारने आपल्याला स्पष्टता द्यावी असे अधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.