एअर इंडिया ला लागली उतरती कळा, थकबाकीमुळे थांबवला इंधन पुरवठा
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

अडचणींत भोव-यात सापडलेली एअर इंडिया (Air India) कंपनीला आता आणखी एक धक्का बसला आहे. थकबाकीमुळे इंडियन ऑइलसह (Indian Oil) सर्व तेल कंपन्यांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा थांबला आहे. थकित रक्कम न भरल्याने तेलकंपन्यांनी एकूण सहा विमानतळांवरील एअर इंडियाचा इंधनपुरवठा थांबविण्यात आला आहे. असे असले तरी एअर इंडियाची विमान सेवा मात्र सुरुच राहणार आहे.

एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ज्या विमानतळांवरील इंधन पुरवठा बंद करण्यात आला आहे, त्यामध्ये रांची, मोहाली, पाटणा, विशाखापट्टणम, पुणे आणि कोच्ची या विमानतळांचा समावेश आहे. गुरुवारी संध्याकाळपासूनच हा इंधनपुरवठा बंद करण्यात आला आहे.

जेट एअरवेज नंतर आता एअर इंडियाचा (Air India) देखील वाईट काळ सुरु झाला असल्याचे जाणवत आहे. कर्जबाजारी झालेल्या एअर इंडिया कंपनीचा 100 टक्के हिस्सा विकण्याच्या मार्गावरही आहे. इतकच नव्हे तर, सध्या कंपनीची स्थिती इतकी वाईट झाली आहे की, कित्येक महिन्यापासून कर्मचाऱ्यांना पगारही दिला गेला नाही.

हेही वाचा- विमान सेवा पुरवणारी सरकारी कंपनी Air India ची होणार विक्री; कर्जामुळे 100 टक्के समभाग विकण्याचा प्रयत्न

सरकारला आशा आहे की नॅशनल एयरलाईन एअर इंडियाची विक्री चार-पाच महिन्यात पूर्ण होईल. वित्त मंत्रालयातील एक वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. याचा फायदा परदेशी विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना होण्याची शक्यता आहे. कारण सध्या परदेशी कंपन्या भारतातील विमान कंपन्यांमध्ये फक्त 49 टक्के गुंतवणूक करू शकतात, मात्र एअर इंडियाच्या विक्रीनंतर सरकार विमान उड्डाण क्षेत्रात परदेशी विमान कंपन्यांना 49 टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक करायला परवानगी देणार आहे.