Anna Hazare Letter to Narendra Modi: अण्णा हजारे यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्ली येथे करणार आंदोलन
Anna Hazare | (Photo Credits: File Photo

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे ( Anna Hazare) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपण जानेवारी महिन्याच्या अखेरीस आंदोलन करणार आहोत. हे आपले अखेरचे आंदोलन असेल असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. आपणास आंदोलन करण्याची परवानगी दिली नाही तरीही आपण आंदोलनास बसणार असल्याचे अण्णांनी पंतप्रधानांना दिलिहेल्या पत्रात ( Anna Hazare Letter to PM Narendra Modi) म्हटले आहे.

कृषी विधेयकं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आदींवरुन केंद्र सरकार आगोदरच अडचणीत आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर पाठिमागील 50 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यामुळे आगोदरच अडचणीत असलेले केंद्र सरकार अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, त्यांनी रामलीला मैदानावर उपोषण आणि आंदोलनासाठी 4 वेळा परवानगी मागितली होती. परंतू, त्यांनी पाठवलेल्या एकाही पत्राला आतापर्यंत एकदाही उत्तर दिले नाही. अण्णानी हेही म्हटले आहे की, या आधी भाजप नेत्यांनी माझे जोरदार कौतुक केले होते. परंतू, आता ते नेते एकाही पत्राचे उत्तर देत नाहीत, असा टोलाही हजारे यांनी लगावला आहे. (हेही वाचा, Anna Hazare यांनी शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी जानेवारी 2021 च्या शेवटच्या आठवड्यात उपोषण करण्याचा दिला इशारा)

अण्णा हजारे यांनी पुढे आपल्या पत्रात म्हटले आहे, जर आठवणच करुन द्यायची आवश्यकता असेल तर भाजप नेत्यांच्या विविध भाषणांच्या क्लिप आम्ही आपल्याला पाठवू शकतो. ज्यात भाजप नेत्यांनी सन 2011 ते 2013 पर्यंत त्यांचे तोंड भरुन कौतुक केले आहे. (हेही वाचा, Anna Hazare Video: भाजपच्या पत्रावर अण्णा हजारे यांचे खडेबोल; पंतप्रधान मोदी, केंद्र सरकारलाही विचारले प्रश्न)

आण्णा हजारे यांनी या आधीही केंद्र सरकारला पत्र लिहून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यात त्यांनी म्हटले होते की, सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नसेल तर ते दिल्लीला येऊन उपोषणाला बसतील. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, जेव्हाते 2019 मध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर आंदोलन करणार होते तेव्हा तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह आणि महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विश्वास दिला होता की, त्यांच्या मागणा मान्य केल्या जातील. मागण्या मान्य होण्याचे अश्वासन मिळाल्याने आपण आंदोलन करणे टाळले. परंतू आतापर्यंत त्या अश्वासनाचे पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे आपण पुन्हा एकदा दिल्ली येथे जाऊन आंदोलन करणार आहोत असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.