मुंबई: कोकणातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि 'दक्षिण कोकणची काशी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा (Anganewadi Jatra 2026) येत्या ९ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी होणार आहे. या यात्रेसाठी लाखो भाविक कोकणात दाखल होत असतात. भाविकांची ही प्रचंड गर्दी लक्षात घेऊन आणि त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोकण रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने यात्रेनिमित्त मुंबई ते मडगाव दरम्यान विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव जंक्शन दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. या गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

  • गाडी क्रमांक ०१००४ (मडगाव जंक्शन - एलटीटी): ही गाडी मडगाव जंक्शनवरून ७ फेब्रुवारी आणि ९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४:३० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ५:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे पोहोचेल.anga
  • गाडी क्रमांक ०१००३ (एलटीटी - मडगाव जंक्शन): ही परतीची गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून ८ फेब्रुवारी आणि १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०:०० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

प्रमुख थांबे आणि डब्यांची रचना

या विशेष गाड्या कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबणार आहेत, ज्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील भाविकांना मोठा फायदा होईल.

  • थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.
  • संरचना: या विशेष गाडीला एकूण २२ डबे असतील, ज्यामध्ये २० स्लीपर कोचेस आणि २ एसएलआर (SLR) डब्यांचा समावेश असेल.

बुकिंगला आजपासून सुरुवात

भाविकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, या विशेष गाड्यांचे बुकिंग आजपासून, म्हणजेच ४ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाले आहे. प्रवाशांना सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (PRS) काउंटर्स आणि आयआरसीटीसीच्या (IRCTC) अधिकृत वेबसाईटवरून तिकीट आरक्षित करता येईल. गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी लवकरात लवकर आपले बुकिंग निश्चित करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आंगणेवाडी जत्रेचे महत्त्व

मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीची यात्रा ही केवळ सिंधुदुर्गच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांसाठी श्रद्धेचा विषय आहे. या जत्रेची तारीख पूर्व नियोजित नसते, तर देवीला 'कौल' लावून ती निश्चित केली जाते. यावर्षी ३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या धार्मिक विधींनंतर ९ फेब्रुवारी २०२६ ही तारीख निश्चित करण्यात आली होती. अवघ्या दीड दिवसांच्या या यात्रेला लाखो भाविक हजेरी लावतात. आता रेल्वेच्या या विशेष सोयीमुळे भक्तांचा प्रवास अधिकच सुखकर होणार आहे.