e-RUPI: ई-रुपी म्हणजे काय? जाणून घ्या नव्या डिजिटल पेमेंट साधनाविषयी
Digital Payment | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट रोजी डिजिटल पेमेंट सुविधा- ई-रुपी चे उद्घाटन केले. हे एक रोखरहित, स्पर्शरहित डिजिटल पेमेंटचे साधन आहे. थेट लाभ हस्तांतरणात ई-रुपी पावती महत्वाची भूमिका बजावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. डीबीटी द्वारे होणारे व्यवहार यामुळे अधिक प्रभावी होतील आणि त्यातून डिजिटल व्यवस्थेला एक नवा आयाम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांची आयुष्ये एकमेकांशी जोडण्याच्या क्षेत्रात, भारत कशी प्रगती करतो आहे, याचे ई-रूपी हे प्रतीक आहे, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

 

ई-रुपी नेमके काय आहे आणि ते कसे काम करते?

ई-रुपी ही मुळात एक डिजिटल पावती आहे जी लाभार्थ्याला त्याच्या फोनवर एसएमएस किंवा QR कोड संदेश रुपात मिळेल. ही एक प्री-पेड पावती (व्हाऊचर) आहे, जे तो/ती (लाभार्थी) कोणत्याही केंद्रात-जिथे ते स्वीकारले जाईल, तिथे जाऊन, ते दाखवून त्याच्या बदल्यात पैसे मिळवू शकेल.

उदाहरणार्थ, जर सरकारला आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या एखाद्या विशिष्ट दवाखान्यातील विशिष्ट उपचारांचा खर्च उचलायचा असेल, तर सरकार त्यांच्यासाठी आपल्या भागीदार बँकेच्या माध्यमातून एका निश्चित रकमेची प्री-पेड ई-रुपी पावती जारी करू शकते. त्या कर्मचाऱ्याला याबद्दल त्याच्या फिचर/स्मार्ट फोनवर एसएमएस किंवा QR कोड च्या माध्यमातून ही पावती मिळेल. मग तो/ती त्या विशिष्ट रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकेल आणि त्याच्या फोनवर आलेल्या ई-रुपी पावतीच्या माध्यमातून रुग्णालयाचे बिल देऊ शकेल. (हेही वाचा, 161st Income Tax Day: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने साजरा केला 161 वा प्राप्तिकर दिवस; FM Nirmala Sitharaman यांच्याकडून प्राप्तिकर विभागाची प्रशंसा)

म्हणजेच, ई-रुपी ही एकदा वापरली जाणारी, स्पर्शरहित रोखरहित पावती आधारित पैसे भरण्याची सुविधा आहे. याच्या मदतीने, उपयोगकर्ता, आपली पावती कुठल्याही डेबिट/क्रेडीट कार्डविना, डिजिटल एप नसतांनाही, अथवा इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर न करताही भरू शकेल.

ई-रुपी म्हणजे डिजिटल चलन नाही, जे आणण्याचा भारतीय रिझर्व बँक विचार करते आहे. उलट ई-रुपी हे व्यक्ती-विशिष्ट, तसेच निश्चित उद्दिष्टासाठी जारी केले जाणारे डिजीटल व्हाउचर आहे.

ई-रुपी ग्राहकासाठी कसे फायदेशीर आहे ?

ई-रुपी साठी लाभार्थ्याचे बँक खाते असण्याची गरज नाही, यां इतर डिजिटल साधने आणि –रुपी मधील एक महत्वाचा फरक आहे. या सुविधेमुळे सुलभ, स्पर्शरहित आर्थिक व्यवहार होऊ शकतील आणि त्यासाठी आपली व्यक्तिगत माहिती देण्याची गरजही पडणार नाही. केवळ दोन टप्प्यांच्या या प्रक्रियेत आपली वैयक्तिक माहिती सांगण्याची गरज नाही.

ई-रुपीचा आणखी एक लाभ म्हणजे, ही सुविधा साध्या फोनवरुनही वापरता येऊ शकेल. आणि म्हणूनच ती स्मार्ट फोन न वापरणाऱ्या अथवा इंटरनेट सुविधा नसलेल्या एखाद्या जागी देखील, सहज वापरता येईल.

पुरस्कर्त्यासाठी ई-रुपीचे काय फायदे आहेत ?

थेट लाभ हस्तांतरण सुविधा अधिक बळकट करण्यात ई-रुपीची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. या सुविधेमुळे थेट लाभ हस्तांतरण अधिक पारदर्शक होऊ शकेल. कारण यात पावती प्रत्यक्षपणे (कागदी) देण्याची गरज नाही. एका दृष्टीने कागदी पावतीचा खर्चही कमी होणार आहे.

सेवा प्रदात्याला या सुविधेचे काय लाभ मिळतील?

एक प्री-पेड पावती म्हणून, ई-रूपी सेवा प्रदात्याला प्रत्यक्ष पेमेंटची ग्वाही देऊ शकता.

ई-रुपी कोणी विकसित केले आहे?

राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) या, भारतातील सर्व डिजिटल पेमेंट व्यवस्थेवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेने ई-रुपी चा शुभारंभ केला. देशात, रोख रहित व्यवहारांना चालना देणारी ही पावती-आधारित सुविधा आहे.

वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या सहायाने ही सुविधा विकसित करण्यात आली आहे.

ई-रुपी कोणत्या बँक्स जारी करू शकतील?

एनपीसीआय ने ई-रुपी व्यवहारांसाठी 11 बँकांशी भागीदारी केली आहे. या बँका म्हणजे, एक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन बँक, इंड्सइंड बँक, कोटक महिन्द्रा बँक, पंजाब नैशनल बँक, भारतीय स्टेट बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया.

भारत पे, भीम बडोदा मर्चंट पे, पाईन लैब्स, पीएनबी मर्चंट पे आणि योनो बँक या एप्सवर देखील ही सुविधा मिळू शकेल.

ई-रुपी उपक्रमात लवकरच अधिक बँका आणि एप्स देखील सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

आता ई-रुपीचा वापर कुठे करतात येईल?

ई-रुपीची सुरुवात करण्यासाठी एनपीसीआय ने 1600 पेक्षा अधिक रुग्णालयांशी टाय-अप म्हणजेच करार केला असून, तिथे ही पावती वापरली जाऊ शकेल.

तज्ञांच्या मते, येत्या काही काळात, ई-रुपीच्या वापरकर्त्यांची संख्या आणि व्याप्ती वाढणार आहे. अगदी खाजगी संस्था देखील, आपल्या कर्मचाऱ्यापर्यंत लाभ पोचवण्यासाठी तसेच एमएसएमई क्षेत्र, व्यवसाय- ते व्यवसाय (बी-टू-बी) व्यवहारांसाठी त्याचा वापर करू शकेल.