Bags On Wheels Service: घरापासून ट्रेनपर्यंत प्रवाशांच सामान पोहचवणार रेल्वे; जाणून घ्या काय आहे, रेल्वेची नवीन 'बॅग्स ऑन व्हील्स' सेवा
Passengers Luggage on railway station (Photo Credit - PTI)

Bags On Wheels Service: भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. रेल्वे लवकरचं प्रवाशांसाठी 'बॅग्स ऑन व्हील्स' सेवा (Bags On Wheels (BOW) Service) सुरू करणार आहे. या सेवेअंतर्गत प्रवाशांच्या स्टेशनवर सामान नेण्याचा ताण आता संपणार आहे. या नवीन सुविधेची अंमलबजावणी झाल्यानंतर, रेल्वे प्रवाशांचे सामान आपल्या घरातून स्टेशनवर नेणार आहे. रेल्वेने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, या सेवेच्या अंतर्गत प्रवाशांना त्यांच्या जागेवर सामान घेऊन जाण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल. भारतीय रेल्वे प्रथमचं या प्रकारची सेवा सुरू करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विना-भाडे-महसूल अधिग्रहण योजना (एनआयएनएफआरआयएस) अंतर्गत अ‍ॅप बेस्ड 'बॅग्स ऑन व्हील्स' सेवा सुरू केली जाईल.

दरम्यान, सध्या ही सेवा फक्त नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, दिल्ली जंक्शन, हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन, दिल्ली कॅन्टोन्मेंट रेल्वे स्टेशन, दिल्ली सराय रोहिल्ला रेल्वे स्टेशन, गाझियाबाद रेल्वे स्टेशन आणि गुरुग्राम रेल्वे स्थानकांवर उपलब्ध असेल. त्याअंतर्गत अॅपमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे रेल्वे प्रवाश्यांच्या घरातून त्यांचे सामान घेऊन ट्रेनमध्ये त्यांच्या डब्यात नेण्यात येईल. (हेही वाचा - Festival Special Trains: दिवाळी-दसरा सणासाठी पश्चिम रेल्वे 'या' मार्गांवर चालवणार 24 विशेष रेल्वे गाड्या )

यासंदर्भात अधिक माहिती देताना उत्तर व उत्तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव चौधरी यांनी सांगितले की, रेल्वे नवीन उपाययोजनांच्या माध्यमातून महसूल वाढविण्याच्या प्रयत्न करत आहे. यासाठी प्रवाशांना रेल्वेच्या बीओडब्ल्यू (BOW) अॅपवर बुकिंग करावी लागेल आणि त्यावर दिलेली सर्व माहिती द्यावी लागेल. (हेही वाचा - Kisan Special Parcel Train: भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी Indian Railways करणार मदत; आता फळे आणि भाजीपाल्याच्या वाहतुकीवर मिळणार 50 टक्के सूट)

या अॅपवर दिलेल्या माहितीच्या आधारे प्रवाशांचे सामान स्टेशनमधून घरी किंवा घराकडून स्टेशन / कोचमध्ये नेले जाईल. तसेच रेल्वे स्थानकातून निघण्यापूर्वी प्रवाशांचं सामान सीटपर्यंत पोहचवण्याची संपूर्ण जबाबदारी रेल्वेची असणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, प्रवाश्यांना या सुविधेचा लाभ अगदी कमी पैशात घेता येणार आहे. या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिक, अपंग लोक आणि एकट्याने प्रवास करणार्‍या महिला प्रवाश्यांसाठी प्रवास करणे अत्यंत सोपे आणि फायदेशीर ठरणार आहे. रेल्वेच्या या सेवेमुळे रेल्वे विभागाला मोठा महसूल मिळणार आहे. याशिवाय प्रवाशांनादेखील या सुविधेचा मोठा फायदा मिळणार आहे.