Ration Card Door to Door Survey: घरात AC आणि Car असूनही वर्षानुवर्षे घेत आहेत मोफत रेशन; डोर-टू-डोर सर्वेक्षणात 'या' राज्यातील नागरिकांची झाली पोलखोल
रेशनकार्ड (Photo Credits- Facebook)

Ration Card Door to Door Survey: घरात एसी, गाड्या वापरणाऱ्या श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांनाही रेशनकार्ड (Ration Card) बनवून अनेक वर्षांपासून मोफत रेशन (Free Ration) मिळत होते. जिल्हास्तरावर शिधापत्रिकांची पडताळणी सुरू असताना एक-दोन नव्हे, तर हजारो अशी प्रकरणे समोर आली आहेत. शिधापत्रिका असलेल्या अपात्र ग्राहकांचे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासनही सतर्क झाले आहे. या अपात्र ग्राहकांवर कारवाई करण्यासाठी पथके तयार करून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यात अपात्र शिधापत्रिकाधारकांची संख्या वाढली आहे. मात्र, आता प्रशासनाने अशा राशनधारकांना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे.

शिधापत्रिकेच्या नावाखाली गरिबांच्या हक्कावर दरोडा टाकणाऱ्या अपात्रांवर प्रशासनाने मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांची पडताळणी केली जात आहे. यासोबतच पुरवठा विभागाने शहरी आणि ग्रामीण भागातील एकूण 367 रेशन दुकानांवर अपात्रतेची यादीही चिकटवली. जेणेकरून लोक जागरुक होऊन त्यांची ओळखपत्रे रद्द करण्यासाठी सबमिट करतील. (हेही वाचा - RBI Governor Hints At More Hikes: जूनमध्ये कर्ज, EMI महागणार! आरबीआय व्याजदरात आणखी वाढ करणार; गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले दरवाढीचे संकेत)

दुसरीकडे, पडताळणी सुरू झाल्यानंतर काही दिवसांतचं तीन हजार अपात्र ग्राहकांनी शिधापत्रिका सबमिट केल्या आहेत. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांच्या संख्येत मोठा घोळ होण्याची शक्यता आहे. अपात्र कार्ड बनवल्याने गरिबांच्या रेशनवर श्रीमंतांनी कब्जा केला आहे. यासंदर्भात विभागाने पडताळणीचे काम सुरू केले आहे.

कोरोनाच्या काळात वाढली अपात्र शिधापत्रिकाधारकांच्या संख्या -

कोरोनाच्या काळात रोजगार बुडाला आणि लॉकडाऊनसह इतर समस्यांमुळे मोठ्या संख्येने लोकांना मोफत रेशन मिळावे म्हणून रेशनकार्ड बनवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामीण भागात शिधापत्रिकाधारकांची संख्या वाढली होती. महागाईमुळे काहींनी विभागीय कर्मचाऱ्यांच्या संगनमताने चुकीच्या माहितीच्या आधारे रेशनकार्ड बनवले आहेत.

अनेक वर्षांपूर्वी मरण पावलेल्याच्या शिधापत्रिकाही विभागापर्यंत पोहोचत आहेत. त्यांचे कुटुंबीय त्या लोकांच्या नावाने जारी केलेले कार्ड दाखवून रेशन दुकानातून गहू, तांदूळ, तेल, मीठ आणि हरभरा घेत होते. उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यात अशी प्रकरणे समोर येत आहेत.