Coronavirus Outbreak: सीबीएसईसह सर्व शैक्षणिक संस्थांच्या चालू परीक्षा 31 मार्चपर्यंत तहकूब; मानव संसाधन विकास मंत्रालयाचा आदेश
Logo of the Central Board of Secondary Education (Photo Credits: cbse.nic.in)

सध्या देशाला कोरोना व्हायरसचे (Corona Virus) संकट मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. प्रत्येक राज्याचे सरकार आणि केंद्र सरकार यावव्र उपाय योजना करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक राज्यांनी अनेक सेवा सुविधा काही कालावधीकरिता बंद केल्या आहेत. सध्या शाळा, कॉलेजही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशात सीबीएसई (CBSE) हायस्कूल आणि इंटरमीडिएट बोर्ड परीक्षाही, 31 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आल्या आहेत. यासह सीबीएसईचे मूल्यांकन कामही 31 मार्चपर्यंत थांबविण्यात आले आहे. सध्याच्या संकटकाळात विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता या निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई व सर्व शैक्षणिक संस्थांना सध्याच्या चालू परीक्षा, 31 मार्चपर्यंत तहकूब करण्याचा आदेश, मानव संसाधन विकास मंत्रालयाने दिला आहे. त्यानंतर सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 31 मार्चपर्यंत तहकूब केल्या आहेत. याबाबत जिल्हा समन्वयक व्ही. के. मिश्रा म्हणाले की, 19 मार्च ते 31 मार्च दरम्यानच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता या परीक्षांची नवीन तारीख 31 मार्चनंतर जाहीर केली जाईल. (हेही वाचा: रत्नागिरीमध्ये Coronavirus रुग्णाची पुष्टी; राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 45 वर; सरकारने घेतले काही महत्वाचे निर्णय)

तसेच सर्व नोडल सुपरवायझर्सना 1 एप्रिलपासून पुनर्मूल्यांकनाचे काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांचा 20 मार्च रोजी शेवटचा Computer Application चा पेपर होणार होता. तर इंटर विद्यार्थ्यांचे 21 मार्च, 24 मार्च आणि 28 मार्च रोजी पेपर होते. आता या सर्व पेपर्सची तारीख नंतर जाहीर केली जाईल. सर्व शाळांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की, ही महत्वाची माहिती आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचेल. दरम्यान,  आज कोरोना व्हायरसच्या रत्नागिरीतील नवीन घटनेसह, महाराष्ट्रात मुंबईत 1 आणि पुण्यात 2 रुग्ण आढळले आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 45 रुग्ण आहेत.