MI vs RR, IPL 2020: हार्दिक पांड्याने धु धु धुतलं! मुंबई इंडियन्सचे RR ला विजयासाठी 196 धावांचे आव्हान
हार्दिक पंड्या (Photo Credit: Twitter/IPL)

MI vs RR, IPL 2020: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 195 धावा केल्या आणि रॉयल्सला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले. अबू धाबी (Abu Dhabi) येथे खेळण्यात आलेल्या आजच्या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण राजस्थानच्या गोलंदाजीपुढे मुंबईच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली मात्र, अखेरच्या पाच ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) फटकेबाजीने मुंबईला आव्हानात्मक धावांपर्यंत मजल मारून दिली. मुंबईसाठी पहिले फलंदाजी करताना हार्दिकने नाबाद 60 धावा केल्या, तर सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 40 तर ईशान किशन 37 आणि सौरभ तिवारीने 34 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, राजस्थानकडून श्रेयस गोपाल आणि जोफ्रा आर्चर यांना प्रत्येकी सर्वाधिक 2 तर कार्तिक त्यागीला 1 विकेट मिळाली. (IPL 2020 Play Off Scenario: आयपीएल प्ले ऑफसाठी कडक लढत; जाणून घ्या कोण कसं पटकावणार अंतिम-4 चं तिकीट)

नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला आणि क्विंटन डी कॉक षटकार मारल्यानंतर क्लीन बोल्ड झाला. ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसर्‍या विकेटसाठी 80 हून अधिक धावांची भागीदारी झाली, पण जोफ्रा आर्चरच्या शानदार झेलमुळे किशन 37 धावांवर माघारी परतला. सूर्यकुमार यादव 26 चेंडूत 40 धावांवर बाद झाला. आजच्या सामन्यात रोहित शर्माच्या जागी मुंबईचे नेतृत्व करताना किरोन पोलार्डही षटकार मारून बाद झाला. यानंतर सौरभ तिवारी आणि हार्दिक पांड्याने अंकित राजपूतच्या 18व्या ओव्हरमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पडला आणि त्या ओव्हरमध्ये 27 धावा लुटल्या. यांनतर आर्चरच्या चेंडूवर सौरभला मोठा शॉट मारण्याचा मोह आवरला आणि ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर 34 धावांवर बेन स्टोक्सकडे झेलबाद झाला. हार्दिकने अखेरच्या ओव्हरमध्ये गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला आणि नाबाद धावा करून परतला. हार्दिकने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावले. हार्दिक 60 आणि क्रुणाल पांड्या 3 धावा करून नाबाद परतले.

दुसरीकडे, आजच्या सामन्यासाठी मुंबईने नॅथन कुल्टर नाईलच्या ऐवजी जेम्स पॅटिनसनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे, तर राजस्थानने त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान टीम 8 व्या क्रमांकावर आहे. राजस्थानने 11 पैकी 4 सामने जिंकले असून 7 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे मुंबई टीम गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईने त्यांच्या 10 पैकी 7 सामने जिंकले असून फक्त 3 सामन्यातच त्यांचा पराभव झाला आहे.