IPL 2022: सलग पराभवानंतर Rohit Sharma च्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, मुंबई इंडियन्सची कमान हातून जाण्यासी शक्यता? ‘या’ नावांची चर्चा सुरू
किरोन पोलार्ड आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 मधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचायझीसाठी सध्याचा हंगाम सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. गेल्या 14 हंगामात पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या MI पलटनने यावेळी आतापर्यंतचे सर्व सामने गमावले आहेत. आणि मुंबई इंडियन्स खेळाडू ज्या प्रकारचा संघर्ष करत आहेत. आगामी सामन्यातही त्याच्याकडून फारशा अपेक्षा नाहीत. त्याचवेळी, सततच्या पराभवामुळे आता कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) क्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. रोहित नेतृत्वासह स्वतः बॅटने देखील धावा करण्यात संघर्ष करत आहे. त्यामुळे आता चाहत्यांमध्येही नाही तर क्रिकेट जाणकारांमध्येही रोहितच्या बदलीची चर्चा रंगली आहे. काही दिग्गज त्याला कर्णधारपद सोडण्याचा सल्ला देत आहेत, जेणेकरून तो फलंदाजीवर लक्ष केंद्रित करू शकेल. अशीच स्थिती राहिल्यास रोहित एकतर स्वतः कर्णधारपद सोडेल किंवा त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत MI च्या नव्या कर्णधाराबाबतही चर्चा सुरू झाली आहे, ज्यामध्ये तीन नावे आघाडीवर आहेत. (IPL 2022, MI vs LSG: प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडली मुंबई इंडियन्स आता बिघडवणार बाकीच्या संघांचे समीकरण! लखनौविरुद्ध खंडित करणार पराभवाचा सिलसिला?)

1. किरॉन पोलार्ड (Kieron Pollard)

वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू पोलार्डने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आयपीएलमध्ये खेळत असून पुढे खेळण्याची चिन्हे दिसत आहेत. पोलार्डकडे विंडीज राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून अनुभव आहे आणि तो बराच काळ मुंबई संघाशी जोडला गेला आहे. त्यामुळे तो संघाला अधिक बारकाईने जाणतो. रोहितच्या अनुपस्थितीत त्याने अनेकदा संघाची धुरा सांभाळली आहे. अशा स्थितीत तो संघाच्या कर्णधार पदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र, यंदाच्या मोसमात तो देखी धावा करण्यात मागे आहे.

2. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)

पोलार्डशिवाय दुसरे नाव बुमराहचे आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज बुमराह संघाची सर्वात मजबूत बाजू आहे. मुंबईच्या वाईट काळातही बुमराह चांगली गोलंदाजी करत आहे. तो टीम इंडियाच्या कर्णधार बनण्याचा दावेदार असून मुंबईचा कर्णधार होऊ शकतो. त्याच्याकडे आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे, त्याचा संघाला फायदा होऊ शकतो.

3. (Suryakumar Yadav)

जिथे मुंबईचे सर्व स्टार फलंदाज एका धावेसाठी झगडत आहेत. दुसरीकडे, सूर्यकुमार संघात सातत्यपूर्ण कामगिरी करून चर्चेत राहिला आहे. त्याला कायम ठेवून संघाने व्यक्त केलेला विश्वास हा योग्य असल्याचं त्याने सिद्ध केले आहे. रोहितचे कर्णधारपद सोडल्यानंतर संघाचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत यादवचा समावेश आहे. जर सूर्यकुमारकडे संघाची कमान असेल तर तो ही भूमिका दीर्घकाळ निभावू शकतो. मात्र, पोलार्ड आणि बुमराह यांच्या तुलनेत त्याची दावेदारी कमकुवत दिसत आहे.

4. ईशान किशन (Ishan Kishan)

आयपीएलच्या चालू हंगामात बहुतांश संघांनी नेतृत्वाची जबाबदारी नव्या आणि युवा चेहऱ्यांवर सोपवली आहे. अशा स्थितीत किशनकडे मुंबई संघाची कमान सोपवली जाण्याची शक्यता आहे. लिलावादरम्यान व्यवस्थापनाने ईशानमध्ये ज्या प्रकारे रस दाखवला, त्यानंतर त्याच्यासाठी फ्रँचायझीची मोठी योजना असल्याचं दिसत आहे.