IPL 2021: मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी, आता संघ फलंदाजांवर अवलंबून
रोहित शर्मा (Photo Credit: Instagram)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) आहे. अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी मुंबईला पहिले फलंदाजी करणे आवश्यक होते. आणि नशिबाने पाच वेळा आयपीएल चॅम्पियन संघाची साथ दिली. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचा रनरेट मानईसमध्ये आहे. अशा स्थितीत त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी 170 पेक्षा अधिक धावांनी हा सामना जिंकावा लागेल. म्हणजेच आता संघाची संपूर्ण जबाबदारी फलंदाजांवर असेल. (IPL 2021, MI vs SRH: मुंबई इंडियन्सना प्लेऑफमध्ये जायचे असल्यास आज ‘या’ खेळाडूंना करावी लागणार कमाल)

5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघासमोर मोठे आव्हान आहे. रोहित शर्माच्या ‘पलटन’चे 13 सामन्यात 12 गुण आहेत. अशा स्थितीत ते पॉईंट टेबलवर संघ सहाव्या स्थानावर असून त्यांचा नेट रनरेट -0.048 आहे. आता हैदराबादवर मोठा विजय मिळवण्यासाठी मुंबईला पहिले फलंदाजी करताना किमान 250 धावांपर्यंत मजल मारावी लागले आणि नंतर गोलंदाजांनाही चमत्कार करून हैदराबादला स्वस्तात ढेर केले पाहिजे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांच्याकडून ‘पलटन’ला मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. शेवटच्या सामन्यात ईशानने राजस्थानविरुद्ध 25 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या होत्या. तसेच रोहितने आतापर्यंत आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 363 धावा केल्या आहेत. पण मधल्या फळीला आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि किरोन पोलार्ड यांना आपली खेळीत सुधार करून आक्रामक बॅटिंग करणे गरजेचे आहे.

यानंतर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वातील गोलंदाजांवर हैदराबादला स्वस्तात गुंडाळण्याची जबाबदारी असेल. मुंबई आणि हैदराबादने आजच्या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहेत. केन विल्यम्सन आणि भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे बाहेर बसल्यामुळे त्यांच्या जागी मोहम्मद नबी व मनीष पांडेचा समावेश केला आहे. दुसरीकडे, मुंबईच्या ताफ्यात कृणाल पांड्या परतला असून पियुष चावलाचे पदार्पण झाले आहे.