IPL 2021: Hardik Pandya याच्यावर संतापला Irfan Pathan, ट्विट करून दिला मोलाचा सल्ला म्हणाला- ‘असे न केल्यास मुंबई इंडियन्सना होणार नुकसान’
हार्दिक पांड्या झाला 'हिट विकेट' (Photo Credit: PTI)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14 च्या मोसमात गतविजेत्या मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळताना अष्टपैलू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) फलंदाज म्हणून काही जबाबदारी दाखवायला हवी, असे मत माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) यांनी व्यक्त केले. दिल्ली कॅपिटल्स विरोधात पहिले फलंदाजी करून कमी धावसंख्या केल्यानंतर झालेल्या मुंबई इंडियन्सच्या पराभवनंतर पठाणने मत मांडले आहे. सामन्यात अमित मिश्राच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला. त्यापूर्वी पहिल्या तीन सामन्यात हार्दिकने अनुक्रमे 13, 15 आणि 7 धावा केल्या आहेत. त्यानंतर, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरोधात देखील तो पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरला. इरफान पठाण म्हणाले की, हार्दिक पांड्याने फलंदाज म्हणून थोडी जबाबदारी दाखवण्याची गरज आहे. (Mumbai Indians Vs Delhi Capitals: मुंबई इंडियन्स संघाचे 'तेलही गेले आणि तुपही गेले', रोहित शर्मा याला 12 लाख रुपयांचा दंड)

पठाण यांनी ट्विटरवर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, पांड्या गोलंदाजी करत नसून फलंदाजीमध्ये अपयशी ठरत आहे, ज्यामुळे मुंबई इंडियन्सला नुकसान होत आहे. यंदाच्या मोसमात मुंबईने आतापर्यंत दोन गमावले असून दोन जिंकले आहेत. “जर हार्दिक गोलंदाजी करत नसेल आणि धावा केल्या नाही तर मुंबई इंडियन्सचे फार नुकसान होईल. त्याने फलंदाज म्हणून काही जबाबदारी दाखवण्याची गरज आहे,”  पठाणने ट्विट केले. हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सकडून अद्याप एकही ओव्हर टाकली नाही. गेल्या वर्षी आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्सचा आघाडी आणि मधल्या फळीत फलंदाजांना अनेक धावा करता आल्या नाहीत तेव्हा हार्दिकने अनेकदा बॅटने जबाबदारी घेतली होती. मात्र, आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सच्या अष्टपैलूला अद्याप बॅटने आपली जादू दाखवता आलेली नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध त्यांच्या पहिल्या सामन्यात 2 विकेटने पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. तथापि, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अनुक्रमे 13 धावा आणि 10 धावांनी विजय मिळवून त्यांनी बाजी मारली. आयपीएलच्या गुणतालिकेत 4 गुणांसह मुंबई इंडियन्स सध्या चौथ्या स्थानावर आहेत.