स्टिव्ह स्मिथ याला दुखापतनंतर BCCI ने भारतीय खेळाडूंना सांगितले नेक गार्डचे महत्त्व
बीसीसीआय | (Photo Credits: PTI)

इंग्लंड (England) विरुद्ध दुसऱ्या अ‍ॅशेस (Ashes) सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) पहिल्या डावात याला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याचा बाउन्सर लागल्याने त्याच्या मानेला दुखापत झाली आणि तो मैदानावरच कोसळला. यामुळे स्मिथला खेळ मधेच शोधून मैदानाबाहेर जावे लागले. आणि त्यानंतर तो दुसऱ्या डावांत फलंदाजी करण्यासाठी आलाच नाही. शिवाय, या दुखापतीमुळे त्याने तिसऱ्या टेस्ट मॅचमधून माघार घेतली आहे. पण, स्मिथच्या या दुखापतीमुळे आता भारतीय क्रिकेट मंडळ, बीसीसीआय (BCCI) देखील टीम इंडिया खेळाडूंसाठी चिंतेत आहे. आगामी वेस्ट इंडिज टेस्ट मालिकेआधी त्यांनी भारतीय खेळाडूंना नेक गार्डबाबत महत्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. (IND vs WI 1st Test: पहिल्या मॅचपूर्वी नवीन टेस्ट जर्सीमध्ये टीम इंडियाने केला खास फोटोशूट, पहा हे Photos)

स्मिथला झालेल्या दुखापतीमुळे सध्या क्रिकेट वर्तुळात फलंदाजांनी नेक गार्ड घालावे की नाही याबाबाद चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डने त्यांच्या खेळाडूंना नेक गार्ड घालण्याची सक्ती केली आहे, बीसीसीआने एन्टी-कॉन्झ्शन हेल्मेट वापरण्याचा निर्णय खेळाडूंवर सोडला आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने डेक्कन क्रोनिकलला सांगितले की, "हेल्मेट खेळाडूंच्या सुरक्षेसाठी असतो, पण काही खेळाडूंना ते घालून खेळणे आवडत नाही. त्यात नेक गार्ड सोबतच्या हेल्मेटमध्ये खेळाडूंना अवघडल्यासारखे वाटू शकते. पण, जोपर्यंत आयसीसी नेक गार्ड घालण्याचे अनिवार्य करत नाही, तोपर्यंत हा निर्णय खेळाडूंवर सोपवलेला बरा.''

टीम इंडियामध्ये शिखर धवन यांच्यासह काही खेळाडू नेक गार्ड असलेला हेल्मेट वापरतात. भारत आणि वेस्ट इंडिज संघातील 2 सामन्यांच्या टेस्ट मालिकेला गुरुवार २२ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.