
Rishabh Pant Accident: डिसेंबर 2022 मध्ये भारतीय क्रिकेटविश्वाला हादरवून टाकणाऱ्या एका भयंकर रस्ते अपघातात ऋषभ पंत जखमी झाला होता. अनेकांना वाटले होते की त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपणार, पण पंतने अपघातावर मात करत क्रिकेटच्या मैदानात जोरदार पुनरागमन केले. त्याच्या पुनरागमनामागे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक ताकदही कारणीभूत ठरली. प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. दिनशॉ पारडीवाला यांनी डेली टेलिग्राफशी बोलताना सांगितले की, अपघातानंतर मुंबईतील रुग्णालयात दाखल होताच पंतने त्यांना विचारलेला पहिला प्रश्न होता – "मी पुन्हा क्रिकेट खेळू शकेन का? तर त्याची आई अधिक व्यावहारिकता दाखवत म्हणाली, 'माझा मुलगा पुन्हा चालू शकेल का? या प्रश्नांनी डॉक्टरांनाही काही काळ गप्प केले.
गंभीर दुखापतींवर मात करत केले पुनरागमन
पंतच्या उजव्या गुडघ्याचे हाड पूर्णपणे तुटले होते, घोट्याला मोठी दुखापत झाली होती आणि शरीराच्या इतर भागांवरही जखमा होत्या. मात्र डॉक्टरांनी दिलासा दिला की पायाला रक्तपुरवठा सुरू होता, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकली असती. अशा अवस्थेतून सावरत, ऋषभ पंतने 21 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले.
प्रेरणादायी संघर्ष
आज ऋषभ पंत इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे आणि आपल्या कामगिरीने संघासाठी मोलाचे योगदान देत आहे. त्याचे हे पुनरागमन केवळ खेळाडूंनाच नव्हे, तर सामान्य माणसांसाठीही एक प्रेरणास्थान आहे.