उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले 'मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनुयायी, आई भवानी मातेचा उपासक'
Venkaiah Naidu, Udayanraje Bhosale | (Photo credit: archived, edited, symbolic images)

राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती (Vice President) व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांनी ट्विट करुन छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या घोषणेबाबत सभागृहात घेतलेल्या आक्षेपावरुन सुरु झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी राज्यसभा खासदार म्हणून संसदेत शपथ घेतली. या वेळी उदयनराजे यांनी जय शिवराज अशी घोषणा दिली. त्यावर अशा घोषणा देण्यात येऊ नये, असे सांगत राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहाचे नियम दर्शवले. यावरुन महाराष्ट्रात जोरदार वादंग सुरु झाला आहे. यावर व्यंकय्या नायडू यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनुयायी आणि आई भवानीचा उपासक आहे. राज्यसभा सभागृहात मी काल जी सूचना केली ती केवळ सभागृहाचे नियम आणि परंपरेला अनूसरुन होती. शपथ घेत असताना कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येत नाहीत. त्यामुळे तेवढेच मी निदर्शनास आणून दिले. यामागे कोणाचाही अवमान करण्याची भावना नव्हती, असे नायडू यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा, उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा खासदार पदी शपथ घेताना दिली जय भवानी जय शिवाजी घोषणा; सभापती व्यंकय्या नायडू यांनी सुनावले (Watch Video))

काय आहे प्रकरण?

राज्यसभा या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात रिक्त झालेल्या जागांवर नव्याने नियुक्त झालेल्या काही सदस्यांचा शपथविधी राष्ट्रतींच्या दालनात पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रियंका चतुर्वेदी, राजीव सातव, उदयनराजे भोसले यांच्यासह 7 खासदारांनी शपथ घेतली. उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. मात्र, शपथ घेतल्यावर त्यांनी जय शिवराय ही घोषणा दिली. दरम्यान, नायडू यांनी शपथ घेताना अशा घोषणा दिल्या जात नाहीत. त्यामुळे केवळ शपथच संसदेच्या रेकॉर्डवर जाईल असे सांगितले. (हेही वाचा, शिवरायांच्या नावाने राजकारण नको; व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चूकीचं नाही- खासदार उदयनराजे भोसले यांचं 'जय भवानी जय शिवाजी' घोषणा प्रकरणावर स्पष्टीकरण)

दरम्यान, छत्रपती शिवरायांचा अपमना झाला अशी भावना निर्माण झाल्याने महाराष्ट्रात विविध संघटनांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या सर्व प्रकारावर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली. उदयनराजे यांनी म्हटले आहे की, शिवाजी महाराज यांच्या नावाने आतापर्यंत खूप राजकारण झाले. शिवाजी महाराज यांचा कोणी अपमान केला असता तर, मी राजीनामा दिला असता. मी गप्प बसलो नसते, असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.