'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही देश पालथा घालण्यास सांगावे' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्यांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस आणखी गडद होताना दिसत आहे. मात्र, कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घराबाहेर पडले पाहिजे, अशी टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कामाची पद्धत आहे, ते एका जागेवरून यंत्रणेवर लक्ष ठेवत असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांनाही देश पालथा घालण्यास सांगावे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

सरकारकडे मागण्या मांडण्याचा विरोधकांना अधिकार आहे. ते सुद्धा लोकशाहीचे, महाराष्ट्राचे घटक आहेत. भूमिका मांडण्याचा त्यांनाही अधिकार आहे. पण हे करताना भान ठेवले पाहिजे. ही वेळ मंदिर उघडण्याची नाही हे सरकारला वाटत असेल तर समजून घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकार करोनाला देवाची करणी मानत नाही. या संकटाशी आपल्याला लढायचे आहे हे माहिती असतानाही विरोध असे वागत असतील तर हे जनतेच्या हिताचे नाही. उद्धव ठाकरे यांच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनाही अशा पद्धतीने काम न करता संपूर्ण देश पालथा घालावा असे सागण्याचे धाडस करावे”, असे आवाहनच संजय राऊत यांनी केले आहे. हे देखील वाचा- मुंबईमध्ये परतू नये म्हणून संजय राऊत यांची धमकी कंगना रनौत चं ट्वीट

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत एकच आहे. पंतप्रधानही कार्यालयात बसून काम करतात. मुख्यमंत्री गेल्यावर गर्दी होते. पंतप्रधान प्रोटोकॉल तोडत नाहीत, मग सीएमनी का तोडावा?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.लोकांच्या जीवाशी खेळले जावू नये, रस्त्यावर उतरुन हे संकट वाढवू नये, असेही मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.