राजस्थान मधील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन 74 बसेस पुण्यात दाखल; स्वारगेट बस स्थानकात होणार स्क्रिनिंग
Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 24 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर देशातील विविध ठिकाणी विद्यार्थी, मजूर, पर्यटक अडकून पडले होते. लॉकडाऊन काळात सार्वजनिक वाहतूक ठप्प असल्याने त्यांचा परतीचा मार्ग बंद झाला होता. मात्र लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपण्यापूर्वी अडकलेल्या सर्व व्यक्तींना मूळ गावी परतण्याची परवानगी देण्यात आली. तसंच राजस्थान मधील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष बसेसची सोय करण्यात आली होती. या 74 बसेस काल रात्री पुण्यात परतल्या आहेत. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून अडकलेल्या विद्यार्थ्यांची घरवापसी झाली आहे. दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांचे स्वारगेट बस स्थानकात स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. तसंच त्यांना होम क्वारंटाईनचा सल्लाही देण्यात आला आहे.

महाराष्ट्रामधील 1780 विद्यार्थी कोटा येथे अडकले होते. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी 29 एप्रिल रोजी बसेस रवाना करण्यात आल्या होत्या. त्या बसेस विद्यार्थ्यांना घेऊन परतल्या आहेत. प्रत्येक बसमध्ये फक्त 20 विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये आणि प्रवास सुसह्य होण्यासाठी या बससोबत एक व्हॅन देखील पाठवण्यात आली होती. (महाराष्ट्र: राजस्थान मधील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विशेष बसेसची सोय)

ANI Tweet:

देशातील कोरोना व्हायरसचे वाढते प्रस्थ पाहता लॉकडाऊनचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील जिल्ह्यांची आणि शहरांची कोरोना रुग्णसंख्येनुसार नव्याने वर्गवारी करण्यात आली आहे. तसंच ग्रीन झोन मधील नागरिकांना काही अटी, शर्थींच्या आधारे मोकळीक देण्यात आली आहे. तर रेड झोनमधील बंधने कायम ठेवण्यात आली आहेत.