Bharat Ratna for Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबतचे वृत्त नाना पटोले यांनी फेटाळले
Nana Patole | (Photo Credits: Facebook)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न ( Bharat Ratna for Savarkar) देण्याबाबतचा प्रस्ताव विधीमंडळात आल्यास आणि जनभावना त्या बाजूने असल्यास आम्ही त्या प्रस्तावाला पाठिंबा देऊ, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले. याबाबत लोकसत्ता या दैनिकात वृत्त छापून आले. मात्र, या विधानाबाबत नाना पटोले यांनी लागलीच स्पष्टीकरण दितेत हे वृत्त दिशाभूल करणारे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. तसेच, सावरकर यांना नव्हे तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न (( Bharat Ratna) देऊन सन्मानित करावे, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे पटोले यांनी सांगितले.

स्वातंत्र्यावीर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबतच्या प्रस्तावाला काँग्रेस पाठिंबा देईल अशा प्रकारचे विधान दस्तुरखुद्द प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडूनच आल्याने राजकीय वर्तुळात एकच आश्चर्य व्यक्त केले जात होते. पटोले यांची ही भूमिका म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेच्या थेट विरोधात असल्याचीही चर्चा रंगली. मात्र, प्रसारमाध्यमांतील वृत्तमुळे पक्ष कार्यकर्ते आणि जनता यांच्यात चुकीचा संदेश जाऊ शकतो हे ध्यानात येताच या वत्ताबाबत पटोले यांनी स्पष्टीकरण दिले.

प्रसारमाध्यमांशी या वृत्ताबाबत बोलताना पटोले म्हणाले, काही प्रसारमाध्यमं भाजपच्या ध्येयधोरणांशी संबंधीत भूमिका घेऊन वृत्त देऊ लागली आहेत. यात ते नाना पटोले यांन कसे अडचणीत आणले जाईल हेही पाहात आहेत. परंतू, आमची भूमिका स्पष्ट आहे. आमची भूमिका आम्ही आज विधिमंडळातही मांडणार आहोत, असे पोटोले यांनी सांगितले. (हेही वाचा, Maharashtra Assembly Budget Session: राम मंदिर निधी संकलन मुद्द्यावरुन विधानसभेत गदारोळ, कामकाज 10 मिनीटांसाठी तहकूब)

दरम्यान, लोकसत्ता या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात 'सत्ताधारी महाविकास आघाडीमधील शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न किताब देण्याचा विधिमंडळात ठराव मांडल्यास, जनभावना त्या बाजूने असेल तर काँग्रेसचा पाठिंबा राहील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले', असे म्हटले होते. या वृत्तावरुन जोरदार चर्चा रंगली होती.