आता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार
Rajdhani Express (Photo Credits-Twitter)

मध्य रेल्वेवरुन धावणारी राजधानी एक्सप्रेस (Rajdhani Express) सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन दिल्ली या मार्गासाठी एक्सप्रेसचा वेग वाढला असून प्रवाशांना आता अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार आहे. यापूर्वी एक्सप्रेसला 1535 किमी अंतर जाण्यासाठी 19 तास लागत होते. मात्र आता एक्सप्रेस हे अंतर 18 तासांत पूर्ण करणार आहे.

शनिवार पासून या एक्सप्रेसचा वेग वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. तसेच प्रवाशांना या पूर्वीपेक्षा 1 तास अगोदर दिल्लीला पोहचता येणार आहे. त्याचसोबत राजधानीला कसारा-इगतपुरी हा घाट ओलांडून जाण्यासाठी बँकर इंजिन ऐवजी पुश-पुल इंजिन लावण्यात आले आहे.

त्यामुळे राजधानी एक्सप्रेसच्या दोन्ही दिशेला पुल-पुश इंजिन जोडण्यात आल्याने घाट मार्ग पार करणे सोईस्कर झाले आहे. तर यापूर्वी बँकर इंजिन असल्यामुळे ते जोडण्साठी आणि काढण्यासाठी फार खर्च येत होता असल्याचे सांगण्यात आले आहे.