मुंबई महानगरपालिकेची  मोठी कारवाई; अनधिकृत फेरीवाल्यांच्या 4 हजार 300 चारचाकी हातगाड्या नष्ट
handcarts (PC - pexels )

मुंबई तसेच मुंबई उपनगरांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची (Unauthorized Hawkers) संख्या जास्त आहे. त्यामुळे अशा अनधिकृत फेरीवाल्याच्या हातगाड्या मुंबई पालिकेने ताब्यात घेतल्या होत्या. पालिकेने ताब्यात घेतलेल्या 4 हजार 300 चारचाकी हातगाड्या नष्ट केल्या आहेत. या अनधिकृत हातगाड्या मुंबईतील 24 प्रभागांमधून ताब्यात घेण्यात आल्या होत्या. मुंबई पालिकेची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

मुंबई शहरामध्ये नागरिक छोटे व्यवसाय करण्यासाठी हातगाड्यांचा वापर करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच अनेकदा या अडथळ्यांमुळे अपघातही होतात. म्हणून महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही कारवाई केली आहे. अतिक्रमण पथकाने मागील काही दिवसांपासून अनधिकृत हातगाड्या जप्त केल्या होत्या. (हेही वाचा - PMC Bank Scam: पीएमसी बँक खाते धारकांचे लोखंडवाला परिसरात आंदोलन)

दरम्यान, महानगरपालिकेने अंधेरी येथून सर्वात जास्त अनधिकृत हातगाड्या जप्त केल्या आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने 16 नोव्हेंबरपासून अनधिकृत हातगाड्या जप्त करण्याची मोहिम हाती घेतली होती. अंधेरीनंतर कुर्ला, चेंबूर याठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे छोटे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा खर्च चालवणाऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे.