मुंबईत प्लास्टिक बंदी केल्यावरही सर्रास वापर सुरु, आतापर्यंत महापालिकेकडून 3 कोटीपेक्षा जास्त दंड वसुली
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

राज्यात पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी 23 जून 2018 मध्ये प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे प्रदुषण होत असल्याने त्यावर बंदी घालण्यात यावी असा निर्णय घेतला. त्यानंतर प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाईसुद्धा करण्यात आली होती. सुरुवातीला प्लास्टिक बंदीला काहींनी विरोध सुद्धा दर्शवण्यास सुरुवात केली. त्यामुळे महापालिकेने एक विशिष्ट टीम नेमून प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

परंतु त्यानंतर सुद्धा प्लास्टिकचा वापर चोरीछुप्या रितीने सुरुच राहिला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापर्यंत महापालिकेने 2.5 करोड रुपयांच्या दंडाची वसूली केली. तसेच 48,163 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले होते.(हेही वाचा-फेरीवाल्यांनो सावधान! आजपासून मुंबईत प्लास्टिक पिशवी देताना आढळल्यास परवाना रद्द होणार)

मात्र आता 23 जून 2018 ते 25 जून 2019 या काळात महापालिकेने 10,35,207 ठिकाणी छापे मारले आहेत. त्यामधून 61851.429 किलोचे प्लास्टिक जमा केले आहे. तर आतापर्यंत महापालिकेने 3,47,70,000 रुपयांच्या दंडाची वसूली केली असल्याचे म्हटले आहे.