
मुंब्रा (Mumbra) मध्ये लोकल ट्रेन मधून काही प्रवासी कोसळून पडल्यानंतर आज मनसे (MNS) कडून धडक मोर्च काढण्यात आला होता. यावेळी मनसे नेते अनिवाश जाधव यांनी रेल्वे प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत. प्लॅटफॉर्म वरील गर्दी पाहता रेल्वे स्थानकांमधील खाद्यपदार्थ आणि पेपर स्टॉल्स कशाला हवेत? हे स्टॉल आठ दिवसांत काढून टाका. अन्यथा मनसे हे स्टॉल्स उखडून टाकेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर हे मनसे पक्षाच्या शिष्टमंडळासह आज मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची मध्य रेल्वेच्या मुख्यालयात सायंकाळी ४.३० वाजता भेट घेणार आहेत. नक्की वाचा: Raj Thackeray On Mumbra Rail Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणावरून राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप; मनसेचा 10 जूनला धडक मोर्चा.
मनसेचा रेल्वे प्रशासनाला इशारा
रेल्वे स्टेशन वर असलेले पेपर आणि वडापावचे स्टॉल्स काढा. डिजिटल युग लोक मोबाईलमध्ये बातम्या वाचतात. स्टेशन वर आल्यावर प्रवासी पाच ते दहा मिनिटांत ट्रेनमध्ये चढतात. त्यामुळे आम्हाला वडापाव स्टॉलची गरज नाही. तुमच्या लोकांना पोसायला काढण्यात आलेले हे टेंडर्स बंद करा. रेल्वे स्थानकातील स्टॉल काढून लोकांना बसायला जागा करा. पुढच्या आठ दिवसांत रेल्वे स्थानकातील हे स्टॉल्स निघाले पाहिजेत. नाहीतर आम्ही ते उखडून फेकून देऊ, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.
रेल्वे अपघातात जखमी झालेलांच्या हजारो केसेस पडून आहेत. पाय गमावलेल्या आणि अपघातात जीव गमावलेल्या लोकांबाबत रेल्वेची भूमिका काय आहे? ठाणे रेल्वे स्थानकातील दहापैकी आठ टॉयलेट्स बंद आहेत. रेल्वे प्रवासी तिकीटाचे पैसे देतात, मग तरीही सुविधा का मिळत नाहीत, असा सवाल अविनाश जाधव यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
दरम्यान कालच्या मुंब्रा स्टेशन मधील दुर्घटनेनंतर आजही मध्य रेल्वेच्या गाड्या खोळंबल्याने अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्म वर गर्दी असल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. हार्बर रेल्वे मार्गवर नेरूळ स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन खोळंबल्या होत्या तर मेन लाईन वर आज सकाळी 9.30 वाजता डोंबिवली येथे नियमित लोकल रद्द झाल्यानंतर प्रवाशांना जबरदस्तीने एसी लोकलमध्ये चढवण्यात आले.