
मुंबई मध्ये आज 10 जून दिवशी मुंब्रा रेल्वे स्थानकामध्ये (Mumbra Rail Accident) लोकल मधील अतिगर्दी ने काही प्रवाशांचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे. मुंबई लोकल मधील गर्दी हा विषय दिवसेंदिवस चिंतेचा होत जात असताना आज दोन विरूद्ध बाजूने जाणार्या ट्रेन मधील प्रवाशांच्या पाठी वरील बॅग एकमेकांना घासून झालेल्या अपघातामध्ये काही जण लोकल मधून पडले. दरम्यान या घटनेवर राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त करत सरकारला धारेवर धरलं आहे. रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांनीच हा प्रकार पाहून तेथे जाणून लोकल मधील गर्दीची प्रकरणं निस्तरावी असं म्हटलं आहे. मुंबईलोकल मधील गर्दी हा विषय नवीन नाही. पण सरकारला लोकांच्या जीवाची किंमतच नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावरही भडकले राज ठाकरे
मध्य रेल्वेच्या लोकल मध्ये सकाळी अति गर्दीमुळे प्रवासी पडल्यानंतर घटनेची माहिती देताना मध्य रेल्वेच्या सीपीआरओंनी आता मध्य रेल्वेच्या येणार्या नव्या लोकल या आपोआप दारं बंद होणार्या असल्याने अशाप्रकारे पडून अपघाती मृत्यू रोखले जातील असं म्हटलं आहे. या निर्णयावर राज ठाकरेंनी मुंबईतील गर्दी पाहता लोकलचे दरवाजे बंद केले तर आत गुदमरून लोकं मरतील अशी भीती व्यक्त केली आहे.
राज ठाकरेंनी परप्रांतीयांचा वाढता लोंढा या समस्यांना कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. मुंबईत मेट्रो, मोनो प्रोजेक्ट सुरू आहेत पण म्हणून खाजगी वाहनांची नोंदणी थांबतेय का? मग या सुविधा कोण वापरत आहे ? असा सवाल विचारला आहे. शहराला टाऊन प्लॅनिंगची गरज असते. मुंबई मध्ये तो केलाच जात नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
मनसेचा धडक मोर्चा
राज ठाकरे यांनी पुण्यातून आज प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केल्यानंतर आता मुंब्रा रेल्वे दुर्घटने विरोधात रेल्वे प्रशासनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा धडक मोर्चा 10 जून दिवशी आयोजित केल्याची माहिती देण्यात आली आहे. गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानक असा हा धडक मोर्चा असणार आहे.
दरम्यान रेल्वे प्रशासनाने सकाळी झालेल्या दुर्घटनेमधील चार मृतांची नावं जाहीर केली आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार मृतांमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलचा देखील समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.