Coronavirus: शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर  रोहित पवार यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर; आमदार मंगल प्रभात लोढा यांचीही ट्विटर वॉरमध्ये उडी

देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ट्विटरद्वारे दिलेल्या प्रत्युत्तरात रोहित पवार यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस, जी आरोप प्रत्यारोप सोडले तर आपण मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असून त्यावर मविआ (महाविकासआघाडी) सरकार व मुख्यमंत्री साहेब काम करतच आहेत.

Coronavirus: शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर  रोहित पवार यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर; आमदार मंगल प्रभात लोढा यांचीही ट्विटर वॉरमध्ये उडी
Rohit Pawar, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोरोना व्हायरस संकटात महाराष्ट्राला मदत आणि इतर मुद्द्यांबाबत पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले. या पत्रावरुन टीका करत पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही एक पत्र लिहावे असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लागावला. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि रोहित पवार यांच्या वादात आता भाजप आमदार मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी उडी घेतली आहे. या आमदारांमध्ये आता ट्विटरवॉरही चांगलेच रंगले आहे.

ट्विटरवॉर रंगण्याचे कारण काय?

देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. फडणवीस यांचे शिष्टमंडळ नेहमीच राज्यपालांना भेटत असते. दरम्यान, या वेळच्या भेटीमध्ये फडणवीस यांच्या शिष्टमंडळाने कोरोना संकट हातळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय असा आरोप केला. राज्यपालांना भेटून आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतही फडणवीस यांनी राज्य सरकार आणि शरद पेवार यांच्यावर टीका केली.

ट्विट

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ट्विटरद्वारे दिलेल्या प्रत्युत्तरात रोहित पवार यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस, जी आरोप प्रत्यारोप सोडले तर आपण मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असून त्यावर मविआ (महाविकासआघाडी) सरकार व मुख्यमंत्री साहेब काम करतच आहेत. पण राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरू शकेल. (हेही वाचा, Coronavirus: शरद पवार यांनी कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्याबाबत सरकारला दिला ट्विटरवरुन सल्ला)

ट्विट

रोहित पवार पुढच्या ट्विटमध्ये म्हणतात, राहिला प्रश्न शरद पवार साहेबांच्या साहेबांच्या पत्राचा. साहेबांच्या दांडग्या अनुभवामुळे त्यांचं पत्र पंतप्रधान मोदीजींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं.त्यामुळे साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो,याचं आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल,असं मला वाटतं.

सरकार कोणत्याही पक्षाचं असो, राज्यातलं असो की केंद्रातलं असो, जनतेच्या हितासाठी राजकारण न करता शरद पवार साहेब अनुभवाच्या बळावर नेहमीच अधिकारवाणीने सर्वांनाच योग्य मार्गदर्शन करत असतात, असे सांगतानाच कोरोनाच्या संकटाशी संपूर्ण राज्य अहोरात्र लढण्यात व्यस्त असताना एकच दिवस आधी केलेल्या पत्रव्यवहाराचा योग्य रिप्लाय प्राप्त होण्यासाठीचा संयम नक्कीच आपल्याकडे असेल अशी अपेक्षा मी आपल्यासारख्या अनुभवी नेत्याकडून करतो, असा टोलाही रोहित पवार यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

ट्विट

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि रोहित पवार यांच्यातील ट्विटरवॉरमध्ये भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांनीही उडी घेतली आहे. ''आमचे नेते मा. देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत, हे आपण मान्य केले, हे योग्यच झाले. भाजपाने मा. मुख्यमंत्र्यांशी सुद्धा संवाद करण्याचा प्रयत्न वारंवार केला. पण, त्याला अशी स्वयंअग्रेषित उत्तरे येतात. मागूनही वेळ मिळत नसेल, तर काय करणार?'' असे म्हणत रोहित पवार यांना ट्विट करुन प्रश्न विचारला आहे. लोढा यांनी पुढच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''राहिला प्रश्न मा. शरद पवारजी यांच्या मार्गदर्शनाचा तर त्याची आज राज्याला सर्वाधिक गरज आहे, हे महाराष्ट्रातील आजच्या स्थितीवरूनच स्पष्ट होते. ते मा. मोदींना पत्र लिहू शकतात, कारण केंद्राने पॅकेज दिले, हे विसरता कामा नये!''.

(The above story first appeared on LatestLY on May 20, 2020 01:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).