Maratha Reservation: राज्य आणि केंद्र सरकारने मिळून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, खासदार संभाजीराजे यांची मागणी
Sambhajiraje Chhatrapati | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संदर्भात केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केला आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र पाठवले आहे. तसेच मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने मिळून मार्ग काढावा, याव्यतिरिक्त आम्हाला काही माहिती नाही, असेही संभाजीराजे यांनी पत्रात नमूद केले आहे.

संभाजीराजे लिहलेल्या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेला निकाल अत्यंत दुर्देवी आहे. आपण सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतोच, परंतु मराठा समाजाला आरक्षण पाहिजेच अशी समाजाची भावना आहे. ते कसे मिळवून द्यायचे? याबाबत राजकीय नेत्रृत्वाने मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे मार्ग काढणे गरजेचे आहे. ती सर्वस्वी जबाबदारी आपणा सर्वांची आहे. राजकारण बाजूला ठेवून या पेच प्रसंगातून मार्ग करण्यासाठी नेहमी सहकार्य करण्याची भूमिका मी कायम घेतली होती आणि यापुढेही घेत राहीन. माझ्यासाठी हा विषय राजकारणाच्या पलीकडचा आहे. कारण वंचित मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी मी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे." हे देखील वाचा- CM Uddhav Thackeray Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय आता पंतप्रधान व राष्ट्रपतींनीच घ्यावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

"आजच्या निकालाने मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. आरक्षणावर एखादा कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत आपण सुपर न्युमररी सारखा पर्याय आमलात आणला पाहिजे. जो राज्याच्या अधिकार क्षेत्रात येतो. यापूर्वी देखील मी याबाबत अनेकदा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पाठपुरावा केलेला आहे. सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा समाज सशक्त करणाऱ्या संस्था सक्षम करणे अत्यंत गरजेचे आहे", असेही संभाजीराजे म्हणाले आहेत.

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालत मराठा समाजाने या राष्ट्रासाठी आजपर्यंत सर्वोच्च त्याग केला आहे. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी ज्या मराठा समाजाला बहुजन समाजासोबत आरक्षण देऊन सर्व बहुजनांना एका छताखाली आणले होते, अशा मराठा समाजावर अन्याय करून चालणार नाही", असेही संभाजीराजे यांनी पत्रात नमूद केले आहे.