लॉकडाऊन करुन भागेल असे वाटत नाही संचारबंदी लागू करा; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती
Awhad and CM (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत 'लॉकडाऊन' (Lockdown) करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनला मुंबईतील जनता गांभीर्याने घेत नसल्याचे  चित्र आज मुलूंडमध्ये चेकनाकाजवळ पाहायला मिळाले. आज सकाळपासून मुलूंड चेकनाक्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. ही चित्र खूपच धक्कादायक आणि चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना ग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असताना लोकांनी अशा पद्धतीने सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन न करणे ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे लॉकडाऊनला ही जनता गांभीर्याने घेत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी लागू करावी अशी विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना केली आहे.

रविवारी म्हणजेच 22 मार्च मध्ये ठेवण्यात आलेल्या 'जनता कर्फ्यू' लोकांनी भरघोस पाठिंबा दिल्याने सर्व राजकीय नेत्यांनी जनतेचे आभार मानले. मात्र त्याचबरोबर महाराष्ट्रात कोरोना ग्रस्तांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सध्या खूप कठीण काळ सुरु झाला आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याचे गांभीर्य लक्षात घेऊन 'लॉकडाऊन करुन भागणार नाही आता संचारबंदी हा एकमेव उपाय आहे', असे जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

पाहा ट्विट:

हेदेखील वाचा- Corona In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाचा तिसरा बळी; फिलिपाइन्स मधून आलेल्या 68 वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू

परिस्थिती गंभीर आहे ..covid positive ची संख्या 89 झाली आहे. लोक गांभीर्याने घेत नाही आहेत मी स्वतः फिरून हा अनुभव घेतला. लोक ऐकत नाहीत संचार बंदी हाच एकमेव उपाय आहे, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा व्हायरसच्या संक्रमितांचा आकडा मागील काही तासात पुन्हा वाढला आहे. आज सोमवार, 23 मार्च रोजी कोरोनाच्या नव्या 15 रुग्णांची यात भर पडली आहे. या 15 पैकी 14 नवे रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत, तर एक रुग्ण हा पुण्याचा आहे. यामुळे सद्य घडीला महाराष्ट्रात तब्बल 89 कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.