Maharashtra Weather Updates: विदर्भ आणि नजिकच्या परिसरात पुढील 24 तासांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस कमाल तापमान 40-43 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात यंदा होळी पूर्वीच उन्हाचा तडाखा जाणवायला लागला आहे. सध्या वायव्य दिशेकडून वाहणारे उष्ण वारे आणि निरभ्र आकाशामुळे राज्यात सूर्य नारायण आग ओकत आहे. महाराष्ट्रासोबतच राजस्थान आणि गुजरात मध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे. मागील 8 दिवसांमध्ये राज्यात कमाल तापमान 6-8 अंशाने वाढलं आहे. आता हे तापमान पुढील 5 दिवस राज्यात असंच चढं राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 21 मार्चपर्यंत राज्यात सौम्य उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस कमाल तापमान 40-43 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान सरासरी पेक्षा 4.5 ते 6 अंशाने वाढल्यास उष्णतेची लाट मानली जाऊ शकते. समुद्र किनारी तापमान 37 अंशाच्या आसपास आहे तर पर्वतीय भागात 30 अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. पुढील 5 दिवसांत यामध्ये 2 ते 4 अंशाची वाढ अपेक्षित आहे. हे देखील नक्की वाचा: Heat Wave Alert: राज्याला उष्णतेचा तडाखा; उष्माघाताचा सामना करण्यासाठी BMC ने जारी केले नियम .
उष्णतेच्या लाटेचा अंदाज
दिनांक 17.03.2022 चा विदर्भासाठी संलग्न हवामान अंदाज आणि इशारे ...
पुढील २४ तासात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता https://t.co/xIXhHVDnLd
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 17, 2022
महाराष्ट्रात सध्या सरासरी कमाल तापमान 37 ते 38 अंश पर्यंत वाढलं आहे. दिवसा उन्हाचा कडाका असला तरीही रात्री थंडी अनेक भागात कायम आहे. पण या अशा वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हीट व्हेवचा धोका लक्षात घेता नागरिकांनी दुपारी 12 ते 3 या वेळेत विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुरेशी खबरदारी घेण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 17, 2022 02:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

