महाराष्ट्र: मंत्रालय, अन्य शासकीय कार्यालयांमध्ये 8 जून पासून 15 टक्के उपस्थिती अनिवार्य
mantralaya mumbai | (Photo credit: archived, edited, representative image)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊनचे आदेश कायम राहणार असल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी सरकारने जाहीर केला आहे. परंतु लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात नियमात शिथीलता आणत काही गोष्टी Unlock नुसार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याच दरम्यान आता राज्यात 8 जून पासून Phase 2 ला सुरुवात होणार असून धार्मिक स्थळे, बस, कार्यालये सुरु होणार आहेत. त्यामुळे आता मंत्रालय आणि अन्य शासकीय कार्यालयांमध्ये सोमवारीपासून (8 जून) 15 टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात येण्यासाठी त्यांच्या वाहतुकीसाठी एसटीकडून अतिरिक्त 250 बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या बसेस मुंबईच्या प्रवेशद्वाराच्या येथून पनवेल, पालघर , आसनगाव, विरार, नालासोपारा, वसई आणि बदलापूर येथून धावणार आहेत. त्यापैकी 142 बस या मंत्रालय, 15 बसेस महापालिकेच्या भवन मार्गावर धावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.(Mission Begin Again: BEST बस सेवा उद्या पासून होणार सुरु; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह इतरांना 'हे' नियम पाळुन प्रवासास मुभा)

दरम्यान, मार्च मध्ये देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बेस्टने बससेवा बंद केली होती. फक्त शासकीय आणि महानगरपालिका कार्यालयांमध्ये काम करणार्‍या आणि रुग्णालयातील कर्मचार्‍यांसह केवळ आवश्यक कामगारांसाठी सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या, मात्र आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत बससेवा पुन्हा सुरु केल्या जाणार आहेत. लॉकडाउन मुळे अगोदरच मुंंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेन सेवा बंद आहे अशावेळी आता मुंबईकरांना तारणहार म्हणुन बसचा वापर होणार आहे.