Maharashtra Covid-19 Relief Application: कोरोनाकाळातील मृतांच्या कुटुंबीयास 50,000 रुपयांचे अर्थसहाय्य, महाराष्ट्र सरकारचा निर्णय; कुठे कराल अर्ज?
Covid-19 Relief | (Photo Credit: Archived, edited, representative images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी काळात मृत झालेल्या नागरिकांच्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपयांचे सानुग्रह सहाय्य अर्थसहाय्य (Covid19 Relief In Maharashtra) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह संबंधितांनी ई-अर्ज (Maharashtra Covid19 Relief Application) दाखल करायचे आहेत. त्यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या http://mahacovid19relief.in या संकेतस्थळावर संबंधितांनी लॉगीन करून अर्ज भरावायाचा आहे, अशी माहिती राज्याच्या महसूल व वन विभागाने दिली आहे.

राज्य सरकारच्या शासन निर्णय क्रमांक- सीएलएस-2021/प्र.क्र.254/म-3 अन्वये हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. शासन निर्णयामध्ये म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या रिट याचिका (सिव्हील) क्र. 539/2021 आणि क्र 554/2021 मध्ये दिनांक 30 जून 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तिच्या निकट नातेवाईकास सहाय्य प्रदान करणेबाबत 11 सप्टेंबर 2021 च्या परिपत्रकान्वये राष्ट्रीयआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. (हेही वाचा, Omicron Variant: कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांवरून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारमध्ये संभ्रम)

ट्विट

शानस निर्णयात पुढे म्हटले आहे की, राज्य सरकारने महसूल व वन विभागाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याकरता योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना सहाय्य प्रदान करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून, त्याद्वारे आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाभार्थ्यांच्या बाँक खात्यामध्ये सहाय्याची/ मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी http://mahacovid19relief.in या संकेतस्थळाला भेट द्या.