मनमाड येथे निवडणूक मतदानाच्या शेवटच्या 15 मिनिटात मतदान केंद्रावर खूप गर्दी झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता, ज्यामुळे मतदानाचा अवधी 8 वाजेपर्यंत वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र तरीही सूत्रांच्या आधारे अंदाज वर्तवण्यात येत आहे.
राज्यात मतदानाचा टक्का हा दयनीय अवस्थेत घसरला असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करवीर मतदारसंघात 79 %, शाहूवाडी मध्ये 74.84 % टक्के तर कागल मध्ये 74.75 % मतदान नोंदवण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज 21 ऑक्टोबर रोजी 5 वाजेपर्यंत 54.53% मतदान नोंदवण्यात आले आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा अवधी असल्याने आता अवघे काहीच क्षण शिल्लक आहेत.
#MaharashtraAssemblyPolls : 54.53% voter turnout recorded till 5 pm for the assembly elections in the state. pic.twitter.com/4yUSCqSqJZ— ANI (@ANI) October 21, 2019
ठाणे मतदारसंघात सुनील खंबे या अतिउत्साही कार्यकर्त्याने मतदान केंद्रात EVM मशीन वर शाई फेकून धुडघूस घातला होता. याठिकाणी उपस्थित पोलिसांनी खंबे यांना तातडीने ताब्यात घेतले आहे.
कर्जत- जामखेड मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याचे समोर येत आहे. यावेळी एका कार्यकर्त्याच्या नाकावर आणि कपाळावर चाकूने वार झाले आहेत. यानंतर लगेचच पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेत कारवाई केली.
धुळे मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल गोटे यांच्यावर मतदान केंद्राच्या बाहेर पैसा वाटप करण्याचा आरोप लागवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 50 हजार रुपयांची रोकड जप्त केल्याचे समजत आहे.
राज्यभरात आज मतदानाच्या दिवशी EVM मशीन संदर्भात एकूण 221 तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. काँग्रेसने औरंगाबाद पश्चिम मतदार संघात सर्वात जास्त म्हणजेच 13 तक्रारी नोंदवल्या आहेत, तर नांदेड उत्तर मतदार संघात 10 आणि नांदेड दक्षिणमध्ये 9 तक्रारी समोर आल्या आहेत.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांनी नुकताच बांद्रा पश्चिम येथील मतदारकेंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
Salman Khan cast vote at a polling vote in Bandra (West), Mumbai. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/n1q0g3MBhz— ANI (@ANI) October 21, 2019
महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 43.78 % मतदान झाले आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यात सर्वाधिक म्हणजे 54 टक्के मतदान कोल्हापूर येथे झाले आहे. सर्वात कमी म्हणजे फक्त 26 टक्के मतदान ठाण्यात झाले आहे. मुंबई मध्ये 35 टक्के तर पुण्यात 44 टक्के, नाशिक आणि नागपूरमध्ये 41 टक्के मतदान झाले आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीमधील एक महत्वाचे कुटुंब म्हणून बच्चन कुटुंबाकडे पहिले जाते. आत विधानसभा निवडणुकीत जया बच्चन यांनी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्यासोबत जुहू येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
Jaya Bachchan, Abhishek Bachchan and Aishwarya Rai Bachchan leave after casting their vote at a polling booth in Juhu, Mumbai. #MaharashtraAssemblyElections pic.twitter.com/ABPO6Be6rk— ANI (@ANI) October 21, 2019
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Vidhan Sabha Elections 2019) पहिला बहुचर्चित टप्पा म्हणजेच मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे. राज्यातील प्रमुख शहरे जसे की, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह 95,473 केंद्रांवर आज एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. विधानसभेच्या 288 जागांमधून आमदारकीची निवडणूक घेऊन यातूनच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री निवडला जाणार आहे. आज सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत या मतदानाचा अवधी असून येत्या 24 ऑक्टोबर ला या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल. मात्र सकाळपासून राज्यात पावसाला सुरुवात झाल्याने निवडणुकीवर त्याला परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात अनेक दिग्गज नेत्यांनी आणि अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी सकाळी मतदान करत जनतेसमोर एक आदर्श ठेवला आहे. महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 43.78 % मतदानाची नोंद झाली आहे.
विधानसभा निवडणूक मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी याकरिता राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात ठेवण्यात आले आहे, तसेच मतदानाच्या दोन दिवस आधीपासून मद्य विक्री बंद ठेवण्यात आली असल्याने अतिउत्साही कार्यकर्त्यांवर चाप बसवण्यात आला आहे. याच प्रमाणे 9000 हुन अधिक मतदान केंद्राच्या परिसरात लाईव्ह वेबकास्टिंगची सोय करण्यात आली आहे, यामुळे कोणतेही गैरप्रकार घडणार नाहीत याची पूर्वदक्षता घेण्यात आली आहे.
यंदा राज्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी यंदा राजकीय तसेच सामाजिक संस्थांनी जनजागृती कार्यक्रम राबवले होते तसेच हा दिवस सार्वजनिक सुट्टीचा जाहीर करण्यात आल्याने आपल्या सोयीनुसार सर्वानी आवर्जून मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय अपंग मतदारांना PWD ऍप द्वारे मतदानाची मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान, 2014 साली निकाल पाहता 288 पैकी 122 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. तर शिवसेनेला 63 , काँग्रेसला 42 , राष्ट्रवादीला 41 जागा मिळवता आल्या होत्या. सध्या अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2019 पर्यंत आहे. तत्पूर्वी घेण्यात आलेल्या निवडणुकीत यंदा निकाल पूर्व स्तरावर लागणार की यावेळी सत्तेचे पारडे बदलणार हे ठरवण्यासाठी आजचे मतदान सत्र महत्वाचे असणार आहे. या दिवसाचे क्षणाक्षणाने अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा लेटेस्टली मराठी.