Lockdown Extension In Maharashtra: महाराष्ट्रात 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवला, राज्य सरकारची मोठी घोषणा
Lockdown | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Lockdown In Maharashtra: महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) तर्फे राज्यात 31 जुलै पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे. सध्या लागू असणारा लॉकडाऊन हा 30 जून रोजी संपणार होता, मात्र राज्यातील कोरोना व्हायरस रुग्णांची वाढते आकडे पाहता पुढील संपूर्ण महिन्यासाठी पुन्हा एकदा लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यानुसार 1 ते 31 जुलै या दरम्यान राज्यात लॉक डाऊन असणार आहे. मात्र जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकांचे आयुक्त परवानगी असलेल्या अनावश्यक कामांवर आणि व्यक्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशिष्ट स्थानिक भागात काही विशिष्ट उपाययोजना व आवश्यक बंधने लागू करू शकतात,असेही सरकार तर्फे सांंगण्यात आले आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी लाईव्ह सेशन मधून नागरिकांशी संवाद साधताना याची पूर्वकल्पना दिली होती.

महाराष्ट्रात मागील तीन दिवसांपासून 5 हजारांवर रुग्ण संख्या वाढत आहे, आतापर्यंत राज्यात एकूण 164626 कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी 86575 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 70607 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत तर 7429 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. मुख्यतः मुंबई, ठाणे, पुणे या भागात तर वारंवार कोरोना रुग्ण समोर येत आहेत, कोकणातून संपलेला कोरोना आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात पुन्हा पसरू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर  नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या भागात कंटेनमेंट झोन मध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आले होते, मात्र आज राज्य सरकार द्वारे संपूर्ण राज्यात लॉक डाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

ANI ट्विट

दरम्यान,लॉक डाऊन पूर्णपणे संपवणे तर सध्या शक्य नाही मात्र 30 जून नंतर मिशन बिगिन अगेन (Mission Begin Again) अंतर्गत राज्यात उद्योग, व्यवसाय आणि खाजगी कार्यालये सुद्धा हळू हळू सुरु केली जाणार आहेत असे ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र यावेळी आपण बेसावध राहून चालणार नाही, काळजी घेतली नाही गर्दी झाली तर पुन्हा संसर्ग पसरेल आणि पूर्ण लॉक डाऊन करण्याला पर्याय उरणार नाही असा इशारा सुद्धा काळ उद्धव ठाकरे यांनी दिला होता.