Lockdown in Maharashtra: राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर वाढणार? काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर वाढणार की नियमांमध्ये काही शिथिलता मिळणार, याबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 1 जून पर्यंत लॉकडाऊन (Lockdown) आहे. मात्र 1 जूननंतरही राज्यातील लॉकडाऊन वाढणार की नियमांमध्ये काही शिथिलता मिळणार, याबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. (Lockdown In Maharashtra: लॉकडाऊन कधी हटणार? कॅबिनेटमंत्री अस्लम शेख यांनी दिले उत्तर)
आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत कोरोनाच्या सद्यपरिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये 10 टक्के पॉझिटीव्ही रेट असल्याने लॉकडाऊन सरसकट उठवला जाणार नाही. मात्र त्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले. याबाबचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करुन घेतील. त्यानंतर काही दिवसांत नव्या गाईडलाईन्स जारी केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल होईल, असे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते.
ANI Tweet:
It has been decided that all COVID19 restrictions will not be lifted as 21 districts have more than 10% positivity rate. Relaxations could be given in the districts where cases are declining, guidelines will be issued in a few days: Maharashtra Health Minister Rajesh Tope pic.twitter.com/x92pTQSHJi
— ANI (@ANI) May 27, 2021
काही जिल्ह्यांना लसीचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे तेथील लसीकरण प्रमाण कमी आहे. अशा जिल्ह्यांना अधिकाधिक लसींचा पुरवठा करुन त्या जिल्ह्यांची राज्याच्या सरासरी प्रमाणाइतकं आणणं गरजेचं आहे. यासंदर्भातील निर्णय बैठकीत झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात लहान घरात विलगीकरणात राहणे शक्य नसल्याने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कोविड केअर सेंटर्समध्ये दाखल करावे. त्याठिकाणी रुग्णाच्या जेवणाची, औषधांची, चाचण्यांची योग्य सोय केली जाईल. तसंच रुग्ण डॉक्टरांच्या निगराणीखाली राहतील. त्यामुळे प्रशासनाच्या या निर्णयाला ग्रामीण भागातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केले आहे.
म्युकरमायकोसिसबद्द्ल राज्याने स्वतंत्र GR काढला असून यासाठी 1000 हॉस्पिटल्स ठरवण्यात आले आहेत. तसंच त्यावर लागणारं औषधं रुग्णांना मोफत देण्याचे आदेश जिल्हाधिकारांना देण्यात आले आहेत. रेशनकार्ड धारक राज्यातील रहिवाशांना म्युकरमायकोसिससाठी एक रुपयाही खर्च येणार नाही, याची तरतूद करण्यात आली आहे, असेही यावेळी टोपे यांनी सांगितले.
(The above story first appeared on LatestLY on May 27, 2021 06:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

