Four Members Of Same Family Murdered In Nashik: नाशिक हादरले! घराबाहेर झोपलेल्या एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरुन निर्घृण हत्या; नांदगाव तालुक्यातील धक्कादायक घटना
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

एकाच कुटुंबियातील चार जणांची गळा चिरुन निघृण हत्या (Four Members Of Same Family Murdered In Nashik) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील वाखारी जवळील जेऊर येथे घडली आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. मृत दाम्पत्य हे आपल्या दोन मुलांसह घराबाहेर झोपले होते. मात्र, संपूर्ण कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची बाब सकाळी उघड झाली आहे. या हत्येमागचे नेमके कारण काय आहे? हे अद्याप अस्पष्ट असून नांदगाव पोलीस आरोपींचा शोध सुरु केला आहे. दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने हत्या केली का? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

समाधान चव्हाण (वय, 37), भारतीबाई चव्हाण (वय, 32), आराध्या चव्हाण (वय, 6), गणेश चव्हाण (वय, 4) असे हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. समाधान हा रिक्षाचालक आहे. तर त्याची पत्नी मोलमजुरी करुन आपला कुटुंबाचा चरितार्थ चालवत असत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे समाधानही घरीच होता. तसेच समाधान हे कुटुंबासह मळ्यातील घरात राहत होते. चव्हाण कुटुंब काल रात्री घराबाहेर झोपले होते. मात्र, सकाळी चौघंही जण रक्ताच्या थारोळ्यात सापडले आहेत. रात्री झोपेतच गळा चिरुन त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. ही घटना रात्रीची असून आज सकाळी त्यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले, असे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी नांदगवा पोलीस अधिक चौकशी करत आहेत. या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हे देखील वाचा-नागपूर: क्षुल्लक कारणावरुन वारंवार शिवीगाळ करणाऱ्या ढाबा मालकाची हत्या; नोकरास अटक

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे संकट वावरत असताना नाशिक येथील घटनेने संपूर्ण राज्यातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लॉकडाऊन दरम्यान गुन्हेगारीच्या संख्येत घट झाल्याची माहिती समोर आली होती. एकीकडे लॉकडाऊनच्या निर्बंधांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. तर, दुसरीकडे गुन्हेगारीच्या घटना पुन्हा एकदा समोर येऊ लागल्या आहेत.