Maharashtra Budget 2021-22:  ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प एक रडगाणे, कोणालाच काही मिळाले नाही- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | (Photo Credits: Facebook)

अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकासआघाडी सरकारचा 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आपला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2021-22) जाहीर केला. या अर्थसंकल्पावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली आहे. हा अर्थसंकल्प राज्याचा होता की राज्यातील काही भागांचा आणि मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प होता असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. या अर्थसंकल्पातून कोणालाच काही मिळाले नाही, शेतकरी, महिला, तरुण आणि नोकरदार वर्गांसह सर्वांनाच निराश केले आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारचा अर्थसंकल्प हा केवळ लिखापोती करणारा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे एक रडगाणे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कर्जमाफीसाठी कोणतीही तरतूद केली नाही. ठाकरे सरकारने दिलेली कर्जमाफी ही आजवरची सर्वात फसवी कर्जमाफी आहे. या सरकारने अर्थसंकल्पात 3 लाख रुपये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला शून टक्के व्याजदराने कर्ज देण्यची भाषा केली आहे. परंतू, या राज्यातील 80% शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. ते कोरडवाहू शेती करतात. त्यामुळे त्यांना केवळ 50 ते 80 हजार इतकेच कर्ज मिळते किंवा तेवढेच कर्ज ते घेतात. त्यामुळे या योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना निटसा मिळणार नाही. (हेही वाचा, Maharashtra Budget 2021-22: अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांच्याकडून महिलांसाठी मोठी घोषणा)

या अर्थसंकल्पात आगोदरच्या सरकारने जाहीर केलेल्या आणि सुरु केलेल्या योजनाच पुन्हा नव्याने जाहीर करण्या आल्या. खरे तर आगोदरच्या सरकारने या योजनांसाठी आधीच्या सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरदूत करुन निधीही दिला आहे. त्यामुळे या सरकारने एकही नवी योजना अपवाद वगळता सुरु केली नाही. ज्या केल्या आहेत त्या आगोदरच्या सरकारनेच सुरु केल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेल दरवाढीवरुन राज्यातील जनतेला दिलासा मिळेल. इंधन दरात काहीशी कपात केली जाईल अशी अपेक्षा होती. परंतू, या करात एक नया पैसा सरकारने कापला नाही. त्यामुळे सतत केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या महाविकासआघडी सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे एक रडगाणे असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.