कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहीर
Image Used For Representation (Photo Credits: Facebook)

चीन देशातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातले आहे. तर कोरोनाचे संक्रमण झाल्याची प्रकरणे 80 च्या पार गेली आहेत. तर महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचे 15 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्राच्या सरकारने राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना येत्या 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. सरकारच्या आरोग्य विभागाकडून याबाबतचे परिपत्रक पाठवण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय सरकारकडून केले जात आहेत. तसेच नागरिकांना सुद्धा स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व खासगी, सरकारी, नगर पंचायत, नगर पालिका शाळा कोरोना व्हायरसमुळे बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परिक्षा वेळापत्रकानुसार पार पडणार असल्याचे ही महाराष्ट्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(Coronavirus: सिनेमागृहाबाबत लेखी आदेश आले तरच बंद ठेवणार, मालकांकडून प्रश्न उपस्थित)

दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसबाबत एक पुन्हा पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पिंपरी, चिंचवड आणि पुण्यातील शाळांना सुट्टी जाहिर केली होती. तसेच सिनेमागृह, जिम, नाट्यगृह, स्विमिंग पूल बंद ठेवण्यात यावे असा निर्णय दिला होता. रेल्वे आणि बस सेवा बंद करणे अशक्य असून जनतेने अनावश्यक प्रवास टाळावे. कोणत्याही कार्यक्रमांना सरकारकडून परवानगी देण्यात येणार नाही. राज्यातील खासगी क्षेत्रातील मालकांनी कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होमची सुविधा द्यावी असे आवाहन करण्यात आले होते. महाराष्ट्रात आढळून आलेल्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांना विलगीकरण कक्षात रुग्णांना ठेवण्यात आले आहेत. दुबई, फ्रान्स आणि अमेरिकेतून आलेले रुग्ण होते.