Ramdas Athawale | (Photo Credits-Facebook)

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawle) यांनी ठाकरे सरकारला जबाबदार धरलं आहे. 'राज्य सरकारच्या बेशिस्तपणामुळे करोना वाढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) करोनाचा सामना करू शकलेले नाहीत,' अशी टिका रामदास आठवले यांनी केली आहे. आठवले आज पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, केंद्र सरकारने 20 हजार कोटींचं पॅकेज दिलं. मात्र, महाराष्ट्र सरकारने राज्यातील मजुरांना, शेतकऱ्यांना, उद्योपतींना, लघु उद्योजकांना मदत करण्यासंदर्भात कोणतीही पाऊलं उचलली नाहीत. उद्धव ठाकरे भाजपशी दोन हात करू इच्छित आहेत. मात्र, ते कोरोनाचा सामना करू शकले नाहीत. सरकारच्या बेशिस्त पणाने कोरोना वाढलेला आहे,' असा आरोपदेखील रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. (हेही वाचा - औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 87 रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण; जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2622 वर पोहोचली)

भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 3 लाखांच्यावर पोहोचला आहे. मुंबईप्रमाणेचं पुण्यातदेखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहनही यावेळी आठवले यांनी केलं आहे. (वाचा - मुंबईत कोरोनाचा हाहाकार! आज दिवसभरात 69 जणांचा मृत्यू, तर 1383 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)

दरम्यान, आज दिवसभरात महाराष्ट्रात 3,427 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 113 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. सध्या राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,04,568 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत राज्यात 3830 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.