Chhatrapati Sambhajinagar: कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात दोन शेतकऱ्यंची आत्महत्या; सिल्लोड जवळील अंधारी येथील घटना
Farmer Suicide | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

हे राज्य सर्वसामान्य जनतेचे आहे. बळीराजाचे आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे असल्याचे सांगणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा पोकळ असल्याची चर्चा शेतकरी वर्गात सुरु झाली आहे. दस्तुरखुद्द कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मतदारसंघात चक्क दोन शेतकऱ्यांनी (Farmer Suicide) आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सिल्लोड येथील अंधारी गावात हा प्रकार घडला आहे. भागिनाथ बाळूबा पांडव (वय 46 वर्षे), जनार्दन सुपडू तायडे (वय 55 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. दोघेही एकाच गावातील रहिवासी असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शेतमालाला नसलेला भाव, नैसर्गिक संकटांमुळे शेतीवर होणारा परिणाम, डोक्यावर वाढणाऱ्या कर्जाचा बोझा आदी कारणांमुळे शेतकरी आगोदरच चिंतेत आहेत. अंधारी गावातील शेतकऱ्यांसोबत असाच काहीसा प्रकार घडला. या गावातील शेतकऱ्यांनी शेतात टरबूज लावले होते. मात्र, टरबूचाचे हवे तसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी नैराश्येत होते. (हेही वाचा, Farmer Suicide: मराठवाड्यात 2022 मध्ये 1,023 शेतकऱ्यांनी संपवले आयुष्य, शेतकरी आत्महत्या सामाजिक चिंतेचा विषय)

अधिक माहिती अशी की, आत्महत्या केलेल्या भागिनाथ पांडव यांच्या मालकीची तीन एकर शेती आहे. ज्यात त्यांनी टरबूज लागवड केली होती. टरबूज लागवडीसाठी त्यांनी कर्जही घेतले होते. मात्र, टरबूजामध्ये अपेक्षीत उत्पन्न मिळाले नाही. ज्यामुळे कर्जाचा बोजा कसा फेडायचा हा सवाल पांडव यांना सतावत होता. त्यातूनच त्यांनी घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेतला. घटनेची माहिती कळताच पोलिस घडनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

याच गावातील जनार्दन तायडे यांनीही गळफास घेतला. तायडे यांच्या नातेवाईकांनी दिलेली महिती अशी की, ते जमीन कसन्यासाठी घेत. मात्र, कसण्यासाठी घेतलेल्या जमीनीतून त्यांना अपेक्षीत उत्पन्नच मिळाले नाही. ज्यामुळे वाढते कर्ज कसे फेडायचे हा सवाल तायडे यांच्यासमोर होता. त्यतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांचे नातेवाईक करतात. पोलिसांनी याही घटनेची नोंद घेतली आहे.