कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केवळ 50% कर्मचाऱ्यांच्या आधारावर काम चालवण्याचे BMC चे खाजगी कंपन्यांना आदेश
Brihanmumbai Municipal Corporation (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव राज्यात झपाट्याने होत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र सातत्याने समोर येणारे कोरोना व्हायरसचे नवे रुग्ण चिंतेत भर घालत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खाजगी कंपन्यांनी केवळ 50% स्टाफच्या आधारावर काम चालवावे, असे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिले आहेत. तसंच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता 188 या कलमाअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

यापूर्वीही मुंबई महानगरपालिकेने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोना व्हायरस संबंधित नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर केवळ कोरोना व्हायरसबद्दल जागरुकता निर्माण करणारे होर्डिंग्स लावण्यात यावे, असे आदेश बीएमसीने दिले होते. (कोरोना व्हायरस जनजागृती करणारे होर्डिंग्स लावण्याचे मुंबई महानगरपालिकेचे आदेश; नियम न पाळण्यास BMC करणार कठोर कारवाई)

ANI Tweet:

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे एकूण 39 रुग्ण आहेत. मात्र कोरोना व्हायरसचा फैलाव झपाट्याने होत असल्याने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे गर्दीचं ठिकाणं टाळणं हे महत्त्वाचं आहे. मात्र मुंबईच्या गर्दीची ख्याती सर्वश्रूत आहे. त्यामुळेच कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुंबईत 31 मार्चपर्यंत जमावबंदी लावू करण्यात आली असून मॉल्स, थिएटर्स, शाळा, कॉलेजेस, जीम, स्विमिंग पूल्स देखील बंद राहणार आहेत.