E-pass सुरु केल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ संतप्त; सरकारला दिला 'हा' सल्ला (View Tweet)

महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी ई-पास आवश्यक असणार आहे. यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ संतप्त झाल्या असून त्यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

E-pass सुरु केल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ संतप्त; सरकारला दिला 'हा' सल्ला (View Tweet)
Chitra Wagh | (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आंतरजिल्हा प्रवासाला बंदी असून जिल्हांतर्गत प्रवासावरही निर्बंध लागू करण्यात आहेत. अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांना ई-पास (E-pass) घेणे गरजेचे असणार आहे. यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) संतप्त झाल्या आहेत. नवीन लॉकडाऊन नियमावलीत ई-पास नसणार असं सांगितलं असाताना अचानक ई-पास का सुरु करण्यात आला असं म्हणत ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसंच यामुळे गोंधळ उडाला असून लोकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरु करा, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे.

चित्रा वाघ ट्विटमध्ये लिहितात, "काल परवा पर्यंत नवीन लॉकडाऊन नियमावलीत ई-पास नसणार असं सांगण्यात आलं होतं. आता अचानक ई-पास बद्दलच्या माहितीने लोकांचा गोंधळ वाढणार आहे. एखादी हेल्पलाईन सुरु केल्यास लोकांना मदत होऊ शकते. राज्यात सत्तराशे साठ लोक वेगवेगळं बोलत असून नुसता गोंधळ झाला आहे."

चित्रा वाघ ट्विट:

(हे ही वाचा: महाराष्ट्रात प्रवासासाठी पुन्हा एकदा लागणार E-pass; कसा कराल अर्ज? जाणून घ्या)

महाराष्ट्र पोलिसांनी ई-पास बद्दल माहिती देणारं ट्विट केलं होतं. त्यावर चित्रा वाघ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक निर्णयावर टीका करण्याची एकही संधी भाजप सोडत नसल्याचे मागील काही काळापासून दिसून येत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2021 05:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).