2 ऑक्टोबरपासून अण्णा हजारेंचे उपोषण ; पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
अण्णा हजारे (Photo Credits: PTI)

लोकपालच्या मुद्यावरुन समाजसेवक अण्णा हजारेंनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचे घोषित केले आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी येथे अण्णा उपोषण करणार आहेत. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीपासून ते उपोषणाला सुरुवात करणार आहेत. लोकपाल आंदोलनामुळेच भारतीय जनता पार्टी (भाजपा) ने केंद्रात सरकार स्थापन केले, असे अण्णा हजारेंचे म्हणणे आहे. पण आता याच मुद्यावर ते टाळाटाळ करत आहेत.

अण्णा हजारेंनी सांगितले की, "2 ऑक्टोबरपासून उपोषण करण्याच्या निर्णयावर ते अटळ आहेत. त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुरुवारी पत्र लिहिले. त्यात त्यांनी गेल्या चार वर्षांपासून सरकारने लोकपाल आणि लोकायुक्तांची नियुक्तीवर टाळाटाळ करत असल्याचे म्हटले आहे." लोकपाल आणि लोकायुक्तांची नियुक्तीसाठी १६ ऑगस्ट २०११ ला पूर्ण देश रस्त्यावर उतरला होता आणि याच आंदोलनामुळे तुमचे सरकार सत्तेत आले, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

पत्रात त्यांनी पुढे म्हटले की, चार वर्ष झाली पण सरकार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे लोकपाल आणि लोकायुक्तांची नियुक्ती टाळत आहे. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.