Coronavirus: महाराष्ट्रात 'या' महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता, राजेश टोपे यांनी व्यक्त केली भिती
Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात (Mahrashtra) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्य सरकारने राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन (Lockdown) 15 मे पर्यंत वाढवला आहे. यासंदर्भात आदेश काढला आहे. त्यानुसार, राज्यात आत्ता लागू असलेले निर्बंध 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहेत. देशात पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) देखील येण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच महाराष्ट्रात जुलै, ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, अशी भिती राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

“महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट महिन्यात येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्याआधी आपण ऑक्सिजनच्या बाबत परिपूर्ण असले पाहिजे. प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनचा प्लांट असला पाहिजे. ऑक्सिजनसाठी आज जी धावपळ सुरु आहे, ती तेव्हा होता कामा नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहेत. याचबरोबर महाराष्ट्रातील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा तसेच गंभीर आजारांवरील उपचारांसाठी निःशुल्क आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, म्हणून महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू केली असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहे. हे देखील वाचा- Coronavirus Vaccination: मुंबईत उद्यापासून तीन दिवस लसीकरण बंद; पुरेशा लससाठ्या अभावी BMC चा निर्णय

महाराष्ट्रात आज 66 हजार 159 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 68 हजार 537 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण 37 लाख 99 हजार 266 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 70 हजार 301 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.69% झाले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.